• Fri. Jul 17th, 2026
    जयंत पाटलांच्या भेटीगाठी सुरुच, फडणवीसांनंतर शिंदेंसोबत खलबतं, विरोध मोडण्यासाठी ‘अर्थ’पूर्ण बैठकीची चर्चा

    Jayant Patil meets Eknath Shinde : ​​​राष्ट्रवादी शप पक्ष भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असून राज्य सरकारमध्ये या पक्षाला वित्त आणि नियोजन खाते दिले जाणार असल्याचे बोलले जाते. जयंत पाटील हे वित्त खात्याचे दावेदार मानले जातात, परंतु त्यास शिवसेनेचा विरोध असल्याचे कळते

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी पाटील यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये साधारण तासभर चर्चा झाली, परंतु त्याचा तपशील मिळू शकलेला नाही.

    सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई केली आहे. चुकीच्या पद्धतीने झालेल्या या कारवाईबद्दल आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, असा खुलासा पाटील यांनी केला. याशिवाय या प्रश्नावर नगरविकास खाते असलेल्या एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार ही भेट झाल्याचे बोलले जात आहे.

    अर्थखात्याचे दावेदार जयंत पाटील

    राष्ट्रवादी शप पक्ष भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असून राज्य सरकारमध्ये या पक्षाला वित्त आणि नियोजन खाते दिले जाणार असल्याची चर्चा आहे. पाटील हे वित्त खात्याचे दावेदार मानले जातात. मात्र, त्यास शिवसेनेचा विरोध असल्याचे कळते. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी शिंदेंची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
    Maharashtra TimesUddhav Thackeray : वाईट काळ संपेल, चांगले दिवस येतील, उद्धव ठाकरेंची ग्वाही; नगरसेवकांकडून एकनिष्ठतेची शपथ

    हा निव्वळ योगायोग

    दरम्यान, ‘राज्याचे अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावे यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भेट घेणार आहेत’, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी दिली. जयंत पाटील यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे दावे नाकारत एकाच वेळी वर्षा निवासस्थानावर पोहोचणे हा योगायोग होता, असेही ते म्हणाले.

    गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एनडीएमध्ये सहभाग होणार का, याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यावर तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले. ‘जयंत पाटील आणि आमची वर्षा निवासस्थानावर भेट झाली नाही. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची यांची भेट का घेतली हे त्यांनी जाहीर केले आहे. तेही एका पक्षाचे नेते आहेत, शिवाय एकेकाळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. अनुभवी नेते आहेत. एक स्वयंभू नेते आहेत. माझी भेट का झाली हे आधीच स्पष्ट केले. प्रफुल पटेल यांना मध्यरात्री बाहेर जायचे असल्याने तेही तिथे आले त्यांचे विषय त्यांनी मांडले. हा योगायोग होता’, असे तटकरे म्हणाले.

    उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; देवेंद्र फडणवीस येणार? किशोरी पेडणेकरांनी डिवचलं

    …तर आम्ही सुनेत्रा पवारांमार्फत बोलतो

    ‘मी खासदारही आहे त्यामुळे मुख्यमंत्री भेट म्हणजे ती राजकीय भेट असेल असा काही भाग नसतो. माझ्या मतदारसंघातील विविध विकासकामे आहेत. माझे दिल्लीस्तरावरील प्रस्ताव राज्यस्तरावर पाठवायचे आहेत. त्यामुळे अशा वेळी सर्वच गोष्टी ज्ञात असणे अभिप्रेतच नाही. ज्यावेळी राजकीय किंवा पक्षाशी निगडीत विषय येईल त्यावेळी परस्परांशी चर्चा करूनच आम्ही भेटत असतो. राजकीय चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत करायची असेल तर सुनेत्रा पवार यांच्याशी आम्ही बोलत असतो’, असे त्यांनी नमूद केले.
    Maharashtra TimesMumbai Local : CSMT फास्ट लोकलच्या लेडीज फर्स्ट क्लासमध्ये डाऊन मारण्यावरुन वाद, महिलेने सहप्रवाशांवर पेपर स्प्रे फवारल्याने गोंधळ

    विलीनीकरण होणार नाही

    ‘अजितदादा असताना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या आणि अंतिम टप्प्यापर्यंत पोचल्याही होत्या. त्या सर्व चर्चा मला माहीत होत्या. परंतु दुर्दैवाने दादांचे निधन झाल्यावर विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या पक्षाची राज्य पातळीवरील बैठक झाली त्यावेळी कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या विलीनीकरण विषयाला पूर्णविराम दिला. त्यामुळे नव्याने चर्चा कुठे सुरू झालेली नाही. त्यामुळे त्यावरही प्रतिक्रिया देण्याचे कारणच नाही’, अशी स्पष्टोक्तीही तटकरे यांनी केली.