मुंबई, दि. ८ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची वाढती गर्दी, संभाव्य अपघात तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ लागू करण्यात आले आहे. हा आदेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.
या आदेशानुसार मावळ तालुक्यातील मौजे लोणावळा परिसरातील भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट , शिवलिंग पाईन्ट, एकविरा देवी कार्ला लेणी तसेच पवना धरण परिसर या प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी आदेश लागू करण्यात आली आहेत.
पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे, पाण्यात उतरणे, वाहतूक कोंडी, सार्वजनिक शांततेचा भंग आणि अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने ही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे.
प्रशासनाने पर्यटकांना आदेशातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले असून, धोकादायक कडे, धबधबे आणि पाणीसाठ्यांच्या परिसरात सुरक्षिततेची काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
०००
किरण वाघ/विसंअ
