मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक शहरांमध्ये रस्ते जलमय झाले असून सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. मुंबईतील लोकल सेवा, रस्ते वाहतूक आणि दैनंदिन जनजीवनावर मोठा परिणाम झाला. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील मिसिंग लिंकवर दरड कोसळण्याची घटना आणि अंधेरी सब वेमध्ये पाणी साचल्याच्या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी पावसाळी नियोजनावरून भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राम मंदिरातील चोरी प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही धारेवर धरलं.