Pratap Sarnaik on Illegal Taxi Bike: महाराष्ट्रात बाईक-टॅक्सी चालवण्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट अनिवार्य करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली. या निर्णयामागची कारणे, महिला सुरक्षेचा मुद्दा आणि स्थानिक रोजगारावर होणारा परिणाम यावरही त्यांनी यावेळी भाष्य केले.
आमदार विलास लांडे यांनी विषय मांडला
या विषयाची सुरुवात शिवसेना (शिंदे गट)चे आमदार दिलीप लांडे यांनी केली. रस्त्यांवर विनापरवाना बाईक-टॅक्सींची संख्या वाढत असल्याचा दावा करत, अनेक चालकांकडे वैध परवाना, आवश्यक कागदपत्रे किंवा पोलीस पडताळणी नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे नमूद करत त्यांनी अशा चालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे उत्तर
त्यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “राज्यात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक वाढत आहे. परप्रांतातून अनेक जण महाराष्ट्रात येतात, बाईक खरेदी करतात आणि थेट वाहतुकीचा व्यवसाय सुरू करतात. हा प्रकार यापुढे सहन केला जाणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे महाराष्ट्राचे डोमिसाईल प्रमाणपत्र असेल, त्यांनाच वाहतुकीचा परवाना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.”
Mumbai High Court : ‘सापत्न वागणूक देणे अस्वीकारार्ह’; निवृत्त कर्मचाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाने ‘बेस्ट’ला खडसावले, नेमकं प्रकरण काय?
शासनाला फायदा होणार, सरनाईकांचा दावा
सरकारच्या मते, या निर्णयामुळे बेकायदेशीर वाहतुकीवर आळा बसेल, प्रवाशांच्या सुरक्षेत सुधारणा होईल आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या चालकांवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. यासोबतच स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी वाढतील आणि शासनाच्या महसुलातही भर पडेल, असा दावा सरनाईक यांनी केला.
निर्णयाच्या अंमलबजावणीकडे लागलं लक्ष
दरम्यान, सरकारच्या या घोषणेनंतर बाईक-टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्या, विद्यमान चालक आणि नव्याने या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरांमध्ये बाईक-टॅक्सींचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने सरकारच्या या घोषणेची अंमलबजावणी नेमकी कधी आणि कोणत्या नियमांनुसार होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
