• Mon. Jul 6th, 2026

    ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ भारतीय संस्कृती, श्रद्धा व अस्मितेचे प्रतीक – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 6, 2026
    ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ भारतीय संस्कृती, श्रद्धा व अस्मितेचे प्रतीक – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    नाशिक, दि. 6 जुलै 2026 (जिमाका वृत्तसेवा): भारताची संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा हजारो वर्षांच्या संघर्षातून आजही अखंड टिकून आहे. सोमनाथ मंदिराचे पुनरुत्थान हे भारतीय समाजाच्या एकता, स्वाभिमान, सांस्कृतिक सामर्थ्य व अस्मितेचे प्रतीक आहे. या ऐतिहासिक पुनरुत्थानाला 75 वर्षे पूर्ण होत असून देशाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून देण्यासाठी सोमनाथ स्वाभिमान पर्वाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

    शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात आयोजित ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ या सांस्कृतिक कार्यक्रमात मंत्री ॲड. शेलार बोलत होते. यावेळी त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, धर्मादाय सह आयुक्त विवेक सोनावणे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबक नगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ, विश्वस्त कैलास घुले, रुपाली भुतडा, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

    मंत्री ॲड शेलार म्हणाले की, इतिहासात सोमनाथ मंदिरावर अनेक आक्रमणे झाली, मात्र भारतीय समाजाने आपली श्रद्धा, संस्कृती आणि परंपरा कायम जपली. या संघर्षातून भारतीय समाजाची एकजूट आणि सांस्कृतिक निष्ठा दिसून येते. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून आणि जनसहभागातून सोमनाथ मंदिराचे पुनरुत्थान करण्यात आले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमनाथ मंदिराच्या पुनरुत्थानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या ऐतिहासिक वारशाचा गौरव केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनामार्फत राज्यभरात कला, संस्कृती आणि परंपरेचे जतन व संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहे. भारतातील आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा हजारो वर्षांचा आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन व नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आभार व्यक्त केले.

    यावेळी ‘शिवांजली’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून सुप्रसिद्ध अभिनेत्री संस्कृती बालगुडे व सहकारी यांनी प्रभावी कलाविष्काराच्या सादरीकरणातून भारतीय परंपरेचे दर्शन घडविले. त्र्यंबकेश्वरच्या पवित्र आणि आध्यात्मिक वातावरणात झालेल्या या सादरीकरणाला उपस्थित भाविक, नागरिक व कलाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed