मुंबई, दि. ३०: माथाडी कामगारांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील असून संबंधित सर्व संघटनांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे निर्देश कामगार मंत्री फुंडकर यांनी दिले.मे. महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड, चाकण येथील माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या, वेतनवाढ, थकीत मजुरी तसेच कामगारांच्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

बैठकीत संबंधित आस्थापनांमध्ये कार्यरत माथाडी कामगारांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव, थकीत मजुरीची वसुली, कामगारांच्या नोंदणीची स्थिती तसेच रोजगाराशी संबंधित विविध मुद्द्यांचा सविस्तर आढावा मंत्री ॲड. फुंडकर यांनी घेतला. कामगारांच्या तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले, कामगारांचे हित जपणे आणि कामगारांना न्याय मिळवून देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. त्याअनुषंगाने कामगारहित डोळ्यासमोर ठेवून आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून नियमानुसार पुढील कार्यवाही करावी.
बैठकीस अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपसचिव (कामगार) स्वप्नील कापडणीस, दिलीप वणिहिरे, सहाय्यक कामगार आयुक्त एन. ए. वाळके यांच्यासह संबंधित अधिकारी, पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे प्रतिनिधी तसेच कंपनीचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीने उपस्थित होते.
०००
