Uddhav Thackeray News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य फुटीच्या चर्चांदरम्यान उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षातील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली असतानाच ठाकरे यांनी या सर्व खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा जाहीर केला आहे. 26 जून ते 29 जून या कालावधीत ते थेट कार्यकर्त्यांमध्ये जाऊन पक्षबांधणीचा संदेश देणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नऊ लोकसभा खासदार असून त्यापैकी सहा जण स्वतंत्र गट स्थापन करून पुढे शिंदे गटात विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी संघटन मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी दौऱ्याची आखणी केली आहे.
26 जूनपासून दौरा
26 जून रोजी सुरू होणाऱ्या या दौऱ्यात 27 जूनला यवतमाळ-वाशिम आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यानंतर 28 जून रोजी ते परभणी आणि धाराशिवमध्ये कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. दौऱ्याचा समारोप 29 जून रोजी शिर्डी लोकसभा मतदारसंघात होणार असून तेथेही कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे.
Maharashtra Assembly Monsoon Session : विरोधी पक्षांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, ‘या’ मुद्द्यांवरुन अधिवेशन गाजणार
पक्ष सोडण्याच्या चर्चांमध्ये असलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न असणार आहे. तसेच स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या पाठीशी पक्ष नेतृत्व ठामपणे उभे असल्याचा संदेश देण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबईसह विविध भागांत शिवसैनिकांनीही मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा आहे.
नेतृत्वावर प्रश्न, ठाकरेंचे प्रत्युत्तर
सहा खासदारांच्या संभाव्य बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विरोधकांसह काही नाराज नेत्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पक्षप्रमुख भेटत नाहीत, फोन घेत नाहीत आणि स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होते, अशा तक्रारी वारंवार पुढे आल्या आहेत. तसेच आदित्य ठाकरे मतदारसंघांच्या दौऱ्यांपेक्षा मुंबईतच अधिक सक्रिय असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
मात्र 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी या सर्व आरोपांना अप्रत्यक्ष उत्तर दिले. “जोपर्यंत माझ्यासमोर लाखो शिवसैनिक उभे आहेत, तोपर्यंत मी नेतृत्व करत राहणार आणि लढत राहणार. मात्र शिवसैनिकांनीच थांबण्यास सांगितले, तर मी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासही तयार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले होते.
