• Thu. Jun 18th, 2026
    Farmer Loan Waiver: शेतकरीहितासाठीच कर्जमाफी; 40 लाख जणांना अटींविना लाभ मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

    Devendra Fadnavis On Farmer Loan Waiver: आगामी काळात कोणत्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

    शेतकरी कर्जमाफी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनें’तर्गत राज्यातील सुमारे ४० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटींशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मात्र, जिल्हा सहकारी बँकांसह संपूर्ण बँकिंग व्यवस्था सुरळीत राहावी यासाठीच शेतकऱ्यांना कर्जफेडीची अट ठेवण्यात आली,’ असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग चार हजार ३९८पेक्षा अधिक दिवस देशाचे नेतृत्व करून सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १२ वर्षांत देशाच्या विकासाला अभूतपूर्व गती दिली आहे. या काळात भारताची प्रतिष्ठा उंचावण्यासह आर्थिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक क्षेत्रांत परिवर्तन घडवून आणले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

    Maharashtra Times‘मला धमकी आलेली असं तुम्हाला कुणी सांगितलं?’; पत्रकारांच्या प्रश्नावर Tukaram Mundhe यांचा प्रतिप्रश्न
    ‘जिल्हा बँका टिकाव्यात यासाठी ज्यांना वारंवार कर्जमाफी मिळालेली आहे अशांना ठरावीक रकमेपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली आहे. कर्जमाफी करताना कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत. शेतकऱ्याला कसे सक्षम करता येईल हेच आम्ही पाहिले आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले.

    ‘एल निनो’बाबत कृती दल
    संभाव्य ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा सर्वत्र कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सरकारने या संकट काळात प्रभावी उपाययोजना आणि पाणी बचत; तसेच वापराचे नियोजन करण्यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
    Maharashtra TimesLadki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; सरकारकडून ३४५ कोटी रुपये वर्ग, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
    ‘शेतकऱ्याला दिला बैल’
    लातूर : बोंबळी (ता. देवणी) येथील काशिनाथ गायकवाड यांचा बैल वादळी पावसादरम्यान वीज पडून मृत्युमुखी पडला. गायकवाड यांच्या पत्नीने पुढाकार घेत थेट जू आपल्या खांद्यावर घेतले आणि शेतीची कामे सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लातूरच्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत त्या शेतकऱ्याला बैल उपलब्ध करून दिला; पण हा बैल दोनच दिवसांत शेतातील मशागतीदरम्यान खाली बसला. पशुवैद्यकीय तपासणीत तो आजारी असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, ‘योग्य तो बैल त्यांना घेऊन देण्याचे निर्देश लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत,’ असेही ते म्हणाले.

    गोकुळ गीते ते मोदी-नेहरूंच्या तुलनेवर शरद पवारांचं वक्तव्य; CM फडणवीस थेट बोलले

    ‘एका दिवसात विदेशी कर्जफेडीची ताकद’
    भारत एके काळी विदेशी कर्जात बुडालेला होता. कमकुवत पाच अर्थव्यवस्थांपैकी एक होता. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्या वेळी यामधून भारत बाहेर पडला नाही, तर कर्जाच्या सापळ्यात अडकेल,’ असे देशाला सांगितले होते. त्या वेळी भारताकडे कर्जाची परतफेड करण्यासाठी विदेशी चलनाचा साठाच नव्हता; पण आज त्याच भारताकडे ९४ टक्के विदेशी कर्जाचे पैसे एका दिवसात परत करावे लागले, तरी तेवढे परकीय चलन आहे. याशिवाय, भारताकडे ११ महिन्यांची आयात करण्याऐवढे पैसे आहेत. ‘यूपीए सरकारच्या काळात भारताकडे एक महिन्याची आयात करण्याइतकेही विदेशी चलन नसायचे,’ असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा