छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने शहरात शोककळा पसरली आहे.
मृतांची नावे
यश ज्ञानेश्वर बारबैले वय १६, रा. लक्ष्मी कॉलनी, सातारा परिसर, आदर्श गौतम इंगोले वय १५, रा. बाराघर, सातारा परिसर, विशाल मच्छिंद्र घुले वय १५, रा. बाराघर, सातारा परिसर अशी मृत पावलेल्या तीनही निष्पाप विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिघेही ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत होते. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने सर्व मित्र सकाळी एकत्र जमले होते. त्यांनी पोहण्याचा बेत आखला. आदर्श आणि त्याचा एक मित्र दुचाकीवरून सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावावर पोहोचले. त्यानंतर सर्व ६ ही मुले उत्साहाच्या भरात तलावाच्या पाण्यात उतरली. मात्र, पाण्याचा आणि खोलीचा योग्य अंदाज न आल्याने अनर्थ घडला.
यश बारबैले: जेवताना फोन आला अन् तो कायमचा निघून गेला.
एकतानगर ५२ घर आणि लक्ष्मी कॉलनी परिसरातील ६ मित्र दुपारी आनंदाचे काही क्षण जगण्यासाठी तलावावर गेले होते. मृत यश बारबैले हा नुकताच अकरावी उत्तीर्ण झाला होता. अभ्यासात हुशार, कष्टाळू आणि होतकरू असलेल्या यशने घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कपड्याच्या दुकानात काम सुरू केले होते. कराटेची आवड असलेल्या यशचे डोळे मोठी स्वप्ने पाहत होते. दुपारी तो घरात शांतपणे जेवण करत बसला होता. तितक्यात मित्रांचा फोन आला आणि तो जेवण अर्धवट टाकून घराबाहेर पडला… मात्र, त्यानंतर परतला तो केवळ त्याचा निर्जीव देहच
आदर्श इंगोले: सकाळीच ११ वीत घेतला प्रवेश, दुपारी काळाचा घाला
दुसरा मृत विद्यार्थी आदर्श इंगोले याच्या बाबतीत घडलेला प्रसंग तर काळीज चिरून टाकणारा आहे. आदर्शने शनिवारी सकाळीच अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली होती. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा ओढतात. वडिलांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आदर्श शिक्षणासोबतच काम करत होता. आता अकरावीत गेलोय, आयुष्याची नवी वाट सुरू होणार अशी स्वप्ने डोळ्यात घेऊन फिरणारा आदर्श कॉलेजचा पहिला दिवस पाहण्यापूर्वीच, प्रवेश घेतल्याच्या अवघ्या काही तासांत काळाच्या पडद्याआड गेला.
विशाल घुले: टँकर आणि मंडप व्यवसायात काम करून द्यायचा कुटुंबाला आधार
तिसरा मृत मित्र विशाल घुले हा देखील अत्यंत जबाबदार होता. तो अवघ्या १५ वर्षांचा होता आणि शिक्षण घेत असतानाच कुटुंबाला आर्थिक मदत करत होता. पाण्याचे टँकर आणि लग्नाचे मंडप डेकोरेशन व्यवसायात मजूर म्हणून काम करून तो घर चालवण्यास मदत करत असे. कष्टाळू आणि कुटुंबासाठी अहोरात्र झटणारा विशाल देखील नियतीच्या कूर खेळाचा बळी ठरला.
निर्जीव देह पाहताच पालकांचा टाहो; उपस्थितांचे डोळे पाणावले
शनिवारी सायंकाळी ६ वाजता ही दुर्घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिक, चिकलठाणा ग्रामीण पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेतली. शोधमोहीम राबवून तलावाच्या खोल भागातून तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या आई-वडील आणि नातेवाईकांनी आपल्या पोटच्या गोळ्यांचे निर्जीव देह पाहताच फोडलेला हंबरडा उपस्थितांच्या काळजाला चिरून गेला. नातेवाईकांचा विलाप आणि मित्रांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून तिथे जमलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ‘घाटी’ रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
