• Tue. Jun 9th, 2026
    Chhatrapati Sambhajinagar News: नुकतीच दहावी पास झालेली तीन मुलं साई टेकडी तलावात बुडाली, काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं छत्रपती संभाजीनगर सुन्न!

    छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने शहरात शोककळा पसरली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: शहरातील सातारा परिसरातील साई टेकडीजवळ एक अत्यंत दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सकाळी हौसेने तलावावर पोहण्यासाठी गेलेल्या ६ मित्रांपैकी ३ जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने एक मित्र पाण्यात बुडू लागला, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर दोघेही पात्रात ओढले गेले आणि तिघांनीही आपले प्राण गमावले. अग्निशमन दल आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे उर्वरित दोन मुलांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले.

    मृतांची नावे

    यश ज्ञानेश्वर बारबैले वय १६, रा. लक्ष्मी कॉलनी, सातारा परिसर, आदर्श गौतम इंगोले वय १५, रा. बाराघर, सातारा परिसर, विशाल मच्छिंद्र घुले वय १५, रा. बाराघर, सातारा परिसर अशी मृत पावलेल्या तीनही निष्पाप विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिघेही ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत होते. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने सर्व मित्र सकाळी एकत्र जमले होते. त्यांनी पोहण्याचा बेत आखला. आदर्श आणि त्याचा एक मित्र दुचाकीवरून सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावावर पोहोचले. त्यानंतर सर्व ६ ही मुले उत्साहाच्या भरात तलावाच्या पाण्यात उतरली. मात्र, पाण्याचा आणि खोलीचा योग्य अंदाज न आल्याने अनर्थ घडला.

    यश बारबैले: जेवताना फोन आला अन् तो कायमचा निघून गेला.

    एकतानगर ५२ घर आणि लक्ष्मी कॉलनी परिसरातील ६ मित्र दुपारी आनंदाचे काही क्षण जगण्यासाठी तलावावर गेले होते. मृत यश बारबैले हा नुकताच अकरावी उत्तीर्ण झाला होता. अभ्यासात हुशार, कष्टाळू आणि होतकरू असलेल्या यशने घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कपड्याच्या दुकानात काम सुरू केले होते. कराटेची आवड असलेल्या यशचे डोळे मोठी स्वप्ने पाहत होते. दुपारी तो घरात शांतपणे जेवण करत बसला होता. तितक्यात मित्रांचा फोन आला आणि तो जेवण अर्धवट टाकून घराबाहेर पडला… मात्र, त्यानंतर परतला तो केवळ त्याचा निर्जीव देहच

    आदर्श इंगोले: सकाळीच ११ वीत घेतला प्रवेश, दुपारी काळाचा घाला

    दुसरा मृत विद्यार्थी आदर्श इंगोले याच्या बाबतीत घडलेला प्रसंग तर काळीज चिरून टाकणारा आहे. आदर्शने शनिवारी सकाळीच अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली होती. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा ओढतात. वडिलांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आदर्श शिक्षणासोबतच काम करत होता. आता अकरावीत गेलोय, आयुष्याची नवी वाट सुरू होणार अशी स्वप्ने डोळ्यात घेऊन फिरणारा आदर्श कॉलेजचा पहिला दिवस पाहण्यापूर्वीच, प्रवेश घेतल्याच्या अवघ्या काही तासांत काळाच्या पडद्याआड गेला.

    विशाल घुले: टँकर आणि मंडप व्यवसायात काम करून द्यायचा कुटुंबाला आधार

    तिसरा मृत मित्र विशाल घुले हा देखील अत्यंत जबाबदार होता. तो अवघ्या १५ वर्षांचा होता आणि शिक्षण घेत असतानाच कुटुंबाला आर्थिक मदत करत होता. पाण्याचे टँकर आणि लग्नाचे मंडप डेकोरेशन व्यवसायात मजूर म्हणून काम करून तो घर चालवण्यास मदत करत असे. कष्टाळू आणि कुटुंबासाठी अहोरात्र झटणारा विशाल देखील नियतीच्या कूर खेळाचा बळी ठरला.

    निर्जीव देह पाहताच पालकांचा टाहो; उपस्थितांचे डोळे पाणावले

    शनिवारी सायंकाळी ६ वाजता ही दुर्घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिक, चिकलठाणा ग्रामीण पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेतली. शोधमोहीम राबवून तलावाच्या खोल भागातून तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या आई-वडील आणि नातेवाईकांनी आपल्या पोटच्या गोळ्यांचे निर्जीव देह पाहताच फोडलेला हंबरडा उपस्थितांच्या काळजाला चिरून गेला. नातेवाईकांचा विलाप आणि मित्रांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून तिथे जमलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ‘घाटी’ रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा