• Fri. Jun 5th, 2026
    Maratha Reservation: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजाला ओबीसींसारख्याच 8 योजनांचा लाभ, हाकेंचा तीव्र आक्षेप

    राज्य सरकारने मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेत ओबीसी समाजाच्या धर्तीवर ८ कल्याणकारी योजना आणि शैक्षणिक सवलती लागू केल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आलेल्या या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मराठा समाजासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाला मिळणाऱ्या विविध योजनांच्या धर्तीवर मराठा समाजासाठी तब्बल आठ कल्याणकारी योजना सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता, त्यानंतर आता शैक्षणिक सवलतींसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थी, युवक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे कोणत्या योजना लागू केल्या गेल्या आहेत, पाहुयात.

    शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना

    दहावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. सध्या ही योजना ओबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.

    वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना

    मराठा समाजातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

    माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती

    इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू होणार आहे.

    शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती

    उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या विविध शुल्कांची रक्कम शासनाकडून थेट विद्यार्थ्यांना परत दिली जाणार आहे. यामध्ये विविध शैक्षणिक खर्चांचा समावेश असेल.

    परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ

    महाराष्ट्रातील मराठा विद्यार्थी राज्याबाहेरील अनुदानित किंवा विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल.

    सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पात्रता

    ओबीसी विद्यार्थ्यांना ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक सवलती मिळतात, त्या सर्व अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजातील विद्यार्थीही पात्र राहतील.

    Maharashtra TimesMamata Banerjee: ममतांसमोर संकट अन् युसूफ पठाण चर्चेत; दिल्ली मार्गाला ब्रेक, TMC मध्ये दुसऱ्या भूकंपाचे संकेत

    संस्थास्तरावरील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही लाभ

    केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांनाही इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती मिळतील.

    भविष्यातील सर्व नवीन सवलती आपोआप लागू

    यापुढे ओबीसी प्रवर्गासाठी ज्या नवीन शैक्षणिक सवलती किंवा सुविधा जाहीर केल्या जातील, त्या स्वतंत्र आदेशाशिवाय मराठा समाजालाही आपोआप लागू होतील. ही या निर्णयातील सर्वात महत्त्वाची तरतूद मानली जात आहे.

    निर्णयावरून वादाची ठिणगी

    दरम्यान, सरकारच्या या निर्णयावरुन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आक्षेप नोंदवला असून, ओबीसी समाजासाठी लागू असलेल्या योजनांचा विस्तार मराठा समाजापर्यंत करताना मूळ लाभार्थ्यांच्या हक्कांवर परिणाम होणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

    ‘ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणारा निर्णय’

    “मराठा समाजासाठी लोककल्याणकारी महाराष्ट्राच्या संकल्पनेतून कोणाची मागणी आली आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करणे हा शासनाचा अधिकार आहे. पण ज्यावेळी ओबीसी आरक्षणाच्या धर्तीवरील सवलती मराठा समाजाला दिल्या जातात, त्यावेळी त्या ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या ठरू शकतात. लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेतून कोणाला काय द्यायचे हा सरकारचा अधिकार आहे. मात्र जे मोर्चे काढू शकतात, सरकारवर दबाव आणू शकतात, त्यांच्या मागण्यांकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाते. घटनात्मक पाया तपासल्याशिवाय निर्णय घेतले जातात, ही चिंतेची बाब आहे. ओबीसींसाठी असलेल्या योजनांमधून मराठा समाजाला लाभ देणे म्हणजे मूळ ओबीसी समाजावर अन्याय करणारे ठरू शकते”, असे हाके म्हणाले.

    ‘हे राज्य फक्त मराठ्यांचे आहे का?’

    पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “या निर्णयाचे स्वागत करण्यासारखे काहीही नाही. महाराष्ट्रात भटके, ओबीसी, दीनदलित असे अनेक समाजघटक आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. जे आंदोलन करू शकतात, त्यांच्याच मागण्या वारंवार मंजूर होताना दिसतात. निवडणुकांवर प्रभाव टाकणाऱ्या समाजघटकांसाठी राज्याची तिजोरी खुली करायची का? सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सरकार कधी बोलणार? महाराष्ट्र हे एका समाजाचे राज्य नाही. राज्यात सर्वाधिक लोकसंख्या ओबीसी समाजाची आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे.”

    जरांगेच्या आंदोलनानंतर आला निर्णय

    दरम्यान, मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी अलिकडेच आंदोलन केले होते. हे आंदोलन १० मागण्यांसाठीचे आमरण उपोषण होते, रखरखत्या उन्हात सुरू केलेल्या या उपोषणादरम्यान सरकारने सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिल्यानंतर मध्यरात्री हे उपोषण स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर राज्यसरकारकडून हा मोठा निर्णय आला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा