उल्हासनगरमधील कॅम्प-५ परिसरात गुरुवारी सायंकाळी भररस्त्यात झालेल्या गोळीबाराने शहर हादरले आहे. कैलाश कॉलनी चौकामध्ये गुरुवारी सायंकाळी अचानक ७ ते ८ हल्लेखोरांनी भररस्त्यात बेछूट फायरिंग करत दोन सख्ख्या भावांची हत्या केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रदीप भणगे, ठाणे: उल्हासनगरमधील कॅम्प-५ परिसरात गुरुवारी सायंकाळी भररस्त्यात झालेल्या गोळीबाराने शहर हादरले आहे. कैलाश कॉलनी चौकात झालेल्या या थरारक हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा काका गंभीर जखमी झाला आहे. जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या हल्ल्यात अनिल हरकेश चौहान (२२) आणि अमन हरकेश चौहान (१७) यांचा मृत्यू झाला. तर अर्जुन सुरजबली चौहान (२६) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास कैलाश कॉलनी चौकात अचानक ७ ते ८ जणांचा गट आला आणि त्यांनी गर्दीसमोरच गोळीबार सुरू केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही क्षणांतच परिसरात एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी धावाधाव केली. हल्लेखोरांनी उघडपणे रस्त्यावर अनेक गोळ्या झाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
Raigad Fort : शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी रायगडावर विशेष मोहीम; दोन दिवस पायरी मार्ग बंद, पण रोपवे सुरू
2020 मधील वैमनस्यातून हल्ला?
प्राथमिक तपासात ही घटना २०२० पासून सुरू असलेल्या जुन्या वैमनस्यातून घडल्याची माहिती समोर आली आहे. अंबरनाथ गावाशी संबंधित एका कुख्यात गुंडा आणि कैलाश कॉलनी परिसरातील काही रहिवाशांमधील वादातून हा गोळीबार झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.
दरम्यान, या प्रकरणातील सहा ते सात आरोपींची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींपैकी काही जण यापूर्वीही हत्येच्या गुन्ह्यात आरोपी होते आणि सध्या जामिनावर बाहेर होते.
आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
घटनेची माहिती मिळताच हिललाइन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिसराची नाकाबंदी करून तपास सुरू करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
“२०२० च्या पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सहा ते सात आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल,” अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा