Mumbai Watermelon Deaths: मुंबईच्या पायधुनी परिसरात बिर्याणी आणि कलिंगड खाऊन एका कुटुंबाचा मृत्यू झाला होता. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. चौकोनी कुटुंबाच्या मृत्यूचं कारण शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबईच्या पायधुनी परिसरात बिर्याणी आणि कलिंगड खाऊन एका कुटुंबाचा मृत्यू झाला होता. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. विषारी कलिंगड खाल्ल्यानं चौकोनी कुटुंबाचा शेवट झाल्याची चर्चा परिसरात होती. त्यानंतर एकाएकी कलिंगडची मागणी घटली. पण मुंबई पोलिसांना चौघांच्या मृत्यूचं कोडं उलगडण्यात यश आलं आहे. कोणत्या फळामुळे नव्हे, तर उंदीर मारण्याच्या औषधाच्या सेवनामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सापडलेले पुरावे आणि शवविच्छेदन अहवाल यामधून महत्त्वाचा उलगडा झाला आहे. डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या शरीरात झिंक फॉस्फाईडचे अंश सापडले आहेत. झिंक फॉस्फाईडचा वापर उंदीर मारण्याच्या औषधात केला जातो. त्यामुळे डोकाडिया कुटुंबानं एकत्रितपणे जीवन संपवलं का, याचा तपास सुरु आहे. या कुटुंबानं खाद्य पदार्थात उंदीर मारायचं औषध स्वत: मिसळलं होतं की यामागे काही घातपात आहे, याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
केमिकलचा वापर करण्यात आलेलं भेसळयुक्त कलिंगड खाल्ल्यानं डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरुवातीला होती. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं कलिंगडाची तपासणी केली. त्यात कोणतीही भेसळ नसल्याचं स्पष्ट झालं. यानंतर आज (७ मे) या प्रकरणात फरेन्सिकचा अहवाल आला.
डोकाडिया कुटुंबाच्या चारही मृत व्यक्तींच्या शरीरात झिंक फॉस्फाईडचे अंश आढळून आले आहेत. या केमिकलचा वापर उंदीर मारण्याच्या औषधात कला जातो. उंदीर मारायचं औषध पोटात गेल्यानंतर डोकाडिया कुटुंबातील सदस्यांना उलट्या सुरु झाल्या. त्यानंतर त्यांनी फॅमिली डॉक्टरकडे धाव घेतली. त्रास जास्त होत असल्यानं त्यांनी रुग्णालय गाठलं. तिथे काही तासांच्या अंतरानं त्यांचा मृत्यू झाला.
अखेर ११ दिवसांनंतर चौकोनी कुटुंबाच्या मृत्यूमागील नेमकं कारण समोर आलं आहे. कलिनातील फॉरेन्सिक लॅबमध्ये अनेक चाचण्या करण्यात आल्या. झिंक फॉस्फाईड पोटात गेल्यावर कुटुंबातील चौघांना उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांच्या शरीरातील झिंक फॉस्फाईड बऱ्याच प्रमाणात आलं. त्यामुळे त्यांच्या शरीरात या केमिकलचे अंश लगेच मिळाले नाहीत. कलिनातील लॅबमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमधून अखेर या प्रकरणाचा उलगडा झाला.
या प्रकरणी पोलिसांनी विविध पैलू ध्यानात घेऊन तपास सुरु ठेवला आहे. डोकाडिया कुटुंब आर्थिक तणावात होतं का, त्यांच्या समोर आणखी काही समस्या होती का, उंदीर मारायचं औषधं त्यांनी स्वत: घेतलं की त्यांना कोणी दिलं, हे प्रश्न कायम आहेत. या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत आहेत.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा