• Wed. Jun 17th, 2026

    Kalyan Dombivli Rickshaw : कल्याण डोंबिवलीत परवाना-बॅज नसतानाही रिक्षा सुस्साट; प्रवाशांकडून मनमानी भाडेवसूली, चालक मालक संघटनांचा संताप

    Kalyan Dombivli Rickshaw : कल्याण डोंबिवलीत परवाना-बॅज नसतानाही रिक्षा सुस्साट; प्रवाशांकडून मनमानी भाडेवसूली, चालक मालक संघटनांचा संताप

    काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडिओने रिक्षा प्रवासाचा गंभीर प्रश्न चव्हाट्यावर आणला आहे. लग्नसराई आणि सुट्ट्यांमुळे रिक्षा मिळेनाशी झाली असून, मनमानी भाडे आकारणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कल्याण/डोंबिवली : गेल्या काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील एका इसमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती व्यक्ती दीड वर्षांच्या चिमुकलीला आणि पत्नीला घेऊन घरी जाण्यासाठी रस्त्यावर रिक्षा थांबवत उभी होती. रात्रीच्या वेळी शेकडो रिक्षांना हात दाखवूनही एकही रिक्षा थांबली नाही. त्यानंतर त्या व्यक्तीने स्वतःबरोबर घडलेली हकिकत सोशल मीडियावर मांडली होती. त्या घटनेतून कल्याण-डोंबिवली परिसरातील रिक्षा प्रवासी वाहतुकीचा प्रश्न किती गंभीर आहे, हे स्पष्ट झालं होतं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी यासंदर्भातील अशाच अनुभवांचा उल्लेख प्रतिक्रियांमधून केला होता.

    रिक्षांचा तुटवडा, प्रवाशांचे हाल

    मुळात कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा स्थानकांवर संध्याकाळच्या वेळेत तुटपुंज्या रिक्षा प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध असतात. रिक्षांची संख्या आणि प्रवाशांची गर्दी यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे अनेकांना कामावरून परतताना घरी जाण्यासाठी रिक्षा मिळत नाहीत. एकीकडे रिक्षांची मोठी मागणी असते, तर दुसरीकडे रिक्षा स्थानके मात्र रिकामी दिसू लागतात. त्यामुळे रिक्षांच्या प्रतीक्षेत अनेक प्रवासी तासन्तास अडकून पडलेले पाहायला मिळतात.

    प्रवाशांची आर्थिक लूट सुरू

    या समस्येची दुसरी बाजूही तितकीच गंभीर आहे. वरील सर्व प्रकार लक्षात घेता, एखादी रिक्षा अशावेळी रिकामी असेल तर चालकांना मनमानी करण्यास मोठा वाव मिळतो. अशातूनच प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

    Maharashtra TimesRohit Pawar : काळी जादू, बोकड बळी, तीन दिवसांची पूजा ते भोंदूबाबा खरातचं कनेक्शन; अजित पवार प्रकरणात रोहित पवारांचे स्फोटक दावे

    रिक्षा संघटनांची नाराजी

    या सर्व प्रकारानंतर रिक्षा चालक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांना लूटणारे रिक्षाचालक हे आमच्या संघटनेचे सदस्य नाहीत. तसेच प्रवासी वाहतुकीसाठी बाद ठरवण्यात आलेल्या, परवाना नसलेल्या आणि बॅज नसलेल्या रिक्षाही येथे सर्रासपणे वापरल्या जातात. अशा चालकांचा आमच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

    लग्नसराई आणि सुट्टीच्या हंगामाचा परिणाम

    सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला, जेव्हा नोकरदार प्रवासी कामावरून परतत असतात, अशावेळी हा प्रकार सर्वाधिक घडतो. वाहनांचा तुटवडा आणि प्रवाशांची गर्दी याचाच फायदा घेत काही रिक्षाचालक जास्तीचे भाडे आकारून प्रवाशांची लूट करत आहेत. सध्या लग्नसराई आणि सुट्टीचा हंगाम असल्याने अनेक रिक्षाचालक गावी किंवा त्यांच्या मूळ प्रांतात गेले आहेत. त्यामुळे रिक्षांचा तुटवडा जाणवत आहे. त्याचाच फायदा काही जण घेत असल्याचा तक्रारीचा सूर रिक्षा संघटनांनी व्यक्त केला आहे. अशा भामट्या चालकांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

    प्रवाशांची फसवणूक टाळण्याचे आवाहन

    “प्रवासी हाच आमचं सर्वस्व आहे. त्याची अशी फसवणूक आणि पिळवणूक करण्याआधी रिक्षा चालकांनी विचार करावा. वाहतुकीची गैरसोय असताना प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊ नये. नेहमीच्या भाड्यातच वाहतूक करावी,” असे आवाहन यावेळी रिक्षा चालक-मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा