• Tue. Jun 16th, 2026

    महाराष्ट्रातील हस्तलिखित दस्तऐवजांच्या नोंदीतून सांस्कृतिक वारसा जगासमोर आणावा – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 28, 2026
    महाराष्ट्रातील हस्तलिखित दस्तऐवजांच्या नोंदीतून सांस्कृतिक वारसा जगासमोर आणावा – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : हस्तलिखित दस्तऐवजांच्या स्वरूपात असलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने डिजिटल नोंदणीचा उपक्रम सुरू केला आहे. या नोंदणीसाठी ‘हर घर दस्तक’ ही विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या हस्तलिखित दस्तऐवजांच्या ऑनलाईन नोंदीतून सांस्कृतिक वारसा जगासमोर आणावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

    पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या सभागृहात याबाबत आयोजित बैठकीत मंत्री ॲड. आशिष शेलार बोलत होते. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, संचालक विभीषण चवरे, उपसचिव सामंत आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सहभाग घेतला.

    मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, देशभरातील हस्तलिखित दस्तऐवजांचे जतन आणि डिजिटलायझेशन करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी ‘ज्ञानभारती ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून राज्यातील हस्तलिखित दस्तऐवज डिजिटल स्वरूपात जतन केले जाणार आहेत. यामुळे भारताचा प्राचीन आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.

    येत्या १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून, राज्यातील सर्व ग्रामसभेत हस्तलिखित नोंदणीचा विषय प्राधान्याने मांडण्याचे निर्देशही मंत्री ॲड आशिष शेलार यांनी देत गावपातळीवरील हस्तलिखित स्वरूपातील स्थानिक वारसा जतन करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगितले.

    स्थानिक पातळीवर हस्तलिखित दस्तऐवज उपलब्ध असलेल्या विविध संस्था, ऐतिहासिक घराणी, नागरिक, संघटना आणि कुटुंबे यांची पुढील सात दिवसात जिल्हा व तालुकास्तरीय सविस्तर यादी तयार करावी. यादी तयार झाल्यानंतर संबंधितांशी संपर्क साधून त्यांच्याकडील दस्तऐवजांची माहिती घेत ‘ज्ञानभारती’ ॲपवर त्यांची नोंदणी करावी. या नोंदणी प्रक्रियेत दस्तऐवजांची मूळ मालकी संबंधित संस्था, घराणी किंवा नागरिकांकडेच कायम राहील. केवळ दस्तऐवजांचे जतन करणे हाच या उपक्रमाचा मूळ हेतू आहे, असेही मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले.

    महाराष्ट्राकडे हस्तलिखितांच्या स्वरूपात असलेला इतिहास हा अमूल्य आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याकडील ऐतिहासिक दस्तऐवज जागतिक स्तरावर नेण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. हा केंद्र शासनाचा महत्त्वाचा उपक्रम असून यामध्ये सर्वांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

    000000

    निलेश तायडे/ वि.स.अ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed