महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात आलंय. मात्र या मराठी सक्तीच्या निर्णयावरून ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करत रिक्षाचालकांनी संपाची हाक दिलीय. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही नवा कार्यक्रम हाती घेतलाय. महाराष्ट्रातील मराठीप्रेमी जनतेला आवाहन मनसेने केलंय. मनसेतर्फे रिक्षांवर ‘मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं, माझ्या रिक्षात तुम्ही बसू शकता’ असे स्टीकर्स लावण्यात येणार आहेत. मराठी येत नाही, बोलणार नाही अशा लोकांना धडा शिकवणार असा इशाराही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.