• Sat. Sep 19th, 2026

आशाताईंच्या जाण्याने संगीताचा सुवर्णकाळ हरपला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Apr 12, 2026
आशाताईंच्या जाण्याने संगीताचा सुवर्णकाळ हरपला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

मुंबई दि.१२: भारतीय संगीत सृष्टीतील अढळ ध्रुवतारा आणि आपल्या सुरावलींनी अवघ्या जगाला मोहिनी घालणाऱ्या ‘पद्मविभूषण’, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनामुळे देशाने एक महान स्वरसम्राज्ञी गमावली आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता आशाताईंच्या जाण्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणतात.

आशाताईंच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी व्यक्त करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, आज प्रत्येक रसिकाच्या मनात एकच आर्त साद उमटत आहे “अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नहीं”. आशाताईंनी त्यांच्या गाण्यांनी आपल्याला इतकं समृद्ध केलं की, त्या कधीतरी आपल्याला सोडून जातील ही कल्पनाच सहन होत नाही. त्यांच्या आवाजातील तोच उत्साह आणि तीच तरलता आता पुन्हा कधीच ऐकायला मिळणार नाही.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रियेत पुढे म्हणतात, आशाताई गेल्यामुळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या प्रत्येकाला कोणीतरी आपल्या परिवाराचा सदस्य गमावल्याचे दुःख आज होत आहे
आशाताई म्हणजे केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या संगीतातील चैतन्याचा झरा होत्या. भक्तीगीत असो, लावणी असो किंवा पाश्चात्य ढंगाची गाणी, प्रत्येक सुरात त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. सर्वाधिक गायनाचा विक्रम करून त्यांनी गिनीज बुक मध्ये आपलं नाव नोंदवलं. प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले ही जिद्द आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

महाराष्ट्र आणि मराठी मातीवर त्यांचे अतोनात प्रेम होते. मराठी भावगीतांना त्यांनी जे वैभव मिळवून दिले, त्यासाठी महाराष्ट्र सदैव त्यांचा ऋणी राहील. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीताचा एक सुवर्णकाळ खऱ्या अर्थाने संपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed