• Sat. Jun 6th, 2026

    गॅस सिलिंडरसाठी वणवण जीवावर बेतली! रेल्वे उड्डाणपुलाची लोखंडी प्लेट अंगावर कोसळल्याने तरुणाचा मृत्यू, मित्र जखमी

    गॅस सिलिंडरसाठी वणवण जीवावर बेतली! रेल्वे उड्डाणपुलाची लोखंडी प्लेट अंगावर कोसळल्याने तरुणाचा मृत्यू, मित्र जखमी

    Riddhapur Railway Bridge Accident: गॅस सिलिंडर आणायला गेलेल्या तरुणाचा रेल्वे उड्डाणपुलाची लोखंडी प्लेट अंगावर कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    अमरावती अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, अमरावती: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असतानाच, ही टंचाई एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना रिद्धपूर येथे घडली. सिलिंडर आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ईश्वर भुरभुरे (३५) रा. दाभेरी यांच्या अंगावर निर्माणाधीन रेल्वे उड्डाणपुलाची लोखंडी प्लेट कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.

    ईश्वर भुरभुरे आणि त्यांचा मित्र प्रभू वानखडे हे दोघे दुचाकीवरून गॅस सिलिंडर घेण्यासाठी चांदूर बाजारकडे जात होते. रिद्धपूर रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून सेंट्रिंगचे काम सुरू होते. दुचाकीवरून पुलाखालून जात असताना अचानक सुमारे एक क्विंटल वजनाची लोखंडी प्लेट ईश्वरच्या थेट डोक्यावर कोसळली. या भीषण आघातात ईश्वर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

    Maharashtra TimesNagpur Crime : सोशल मीडियावर ओळख, फूस लावून शाळेतून पळवलं, पालकांना लेक गैरहजर असल्याचा मेसेज; अल्पवयीन मुलीवर अत्याचार
    ग्रामस्थांचा संताप; अटकेची मागणी
    गॅसच्या टंचाईमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना, कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप जीव गेल्याने दाभेरी ग्रामस्थांनी रुग्णालयात संताप व्यक्त केला. संबंधित कंत्राटदार आणि सुपरवायझरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक ईश्वर वर्गे व वैभव घोगरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

    Maharashtra TimesAshok Kharat: खरात अधिकाऱ्यांना एकमेकांच्या पत्नीशी संबंध ठेवायला लावायचा; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, सरकारकडून उत्तर
    तर दुसऱ्या एका घटनेत, कामठी रोडवरील ऑटोमोटिव्ह चौकाजवळील अंबुजा गोडावून परिसरात बुधवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत तीन ट्रक पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी ६ वाजताच्या सुमारास एका ट्रकला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. काही क्षणातच आग इतर ट्रकपर्यंत पसरली. सुगतनगर अग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यास सुरुवात केली. आगीत आशिक खान कुरैशी यांचा एमपी-२२-एच-७२२१, राजाराम यादव यांचा एमएच-४०-सीडी-२०१२ आणि सुनील बाचले यांच्या मालकीचा एमएच-४०-८०९ हे ट्रक जळून खाक झाले. नुकसानीचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा