• Sun. Jun 7th, 2026
    Harshwardhan Sapkal: महाराष्ट्राची पुरती नाचक्की; मंत्री झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर हर्षवर्धन सपकाळांची टीका

    Harshwardhan Sapkal On Narhari Zirwal: सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नरहरी झिरवाळांची मंत्रिपदावरून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

    हर्षवर्धन सपकाळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : भोंदूबाबा अशोक खरातच्या अनैतिक दरबारात हजेरी लावणाऱ्या महायुती सरकारमधील डझनभर मंत्र्यांच्या अश्लील व अश्लाघ्य कारनाम्याने महाराष्ट्राची पुरती नाचक्की झालेली असताना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

    सपकाळ यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील टीका केली. सपकाळ म्हणाले की, ‘अशोक खरात प्रकरणात डझनभर मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग आहेच पण सर्वात लाजीरवाणी बाब म्हणजे महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचेच घनिष्ट संबंध असावेत हे अत्यंत लांछनास्पद आहे, चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला असला तरी त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचे अध्यक्षपद अद्याप कायम आहे. चाकणकर यांच्यानंतर नरहरी झिरवाळांचा प्रताप समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मात्र यावर काहीही भाष्य केलेले नाही. सुनेत्रा पवार यांनी या दोघांनाही सर्व पदावरून मुक्त करावे’.

    Maharashtra TimesNarhari Zirwal: राजीनामा की अभय? आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओनंतर नरहरी झिरवाळ याचं पद पुन्हा धोक्यात
    सुळेंच्या वक्तव्याचा घेतला समाचार
    राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा वारसा चालवित असल्याचे वक्तव्य नुकतेच केले. या वक्तव्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सुळे यांचे विधान दिशाभूल करणारे आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर व देवेंद्र फडणवीस दोघांच्या विचाराचा वारसा व मार्ग भिन्न आहेत, असे स्पष्ट करून सुळे यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

    ‘तो’ तृतीयपंथी ज्येष्ठ नेत्याच्याही निकटचा ?
    अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यापासून पक्षांतर्गत जोरदार कुरघोड्यांचे राजकारण सुरू असून त्यातच मंत्री टीकेचे धनी ठरत असल्याने संकटांची मालिका कशी थोपवावी याविषयी पक्षात जोरदार खल सुरू आहे. त्यातच, झिरवाळ यांच्यासोबत आढळून आलेली तृतीयपंथी व्यक्ती पक्षातीलच एका ज्येष्ठ नेत्याच्याही जवळ असल्याचे बोलले जात असून त्याविषयी चर्चा सुरू झाली तर पक्षाला फटका बसू नये यासाठीही रणनीती तयार केली जात असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

    Maharashtra TimesMaharashtra Government : तुमच्या शेताकडे जाणारा रस्ता अडवणाऱ्यावर आता कठोर कारवाई होणार, फडणवीस सरकारचा निर्णय
    ‘शासकीय बंगल्याचा गैरवापर’
    नागपूर : अशोक खरात प्रकरण आणि मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचा झालेला गैरवापर यावरून काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात एसीबी ट्रॅप लावून पकडण्यात आले तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली नाही. आता त्यांनी शासकीय निवासस्थानाचा गैरवापर केला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. गुरुवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, ‘काही लोक तंत्र-मंत्राचा वापर करून खुर्ची टिकवण्याचे किंवा इतरांना हटवण्याचे प्रयत्न करत आहेत. हे कृत्य संविधानाची शपथ घेणाऱ्यांना शोभा देणारे नाही. त्यामुळे या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घ्यावी. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी. पुणे जमीन घोटाळा असो वा आरटीओमधील वसुली, सरकार केवळ लहान माशांवर कारवाई करून मोठ्या माशांना वाचवत आहेत. सध्याच्या सरकारमध्ये अंतर्गत गँगवॉर सुरू असून मंत्री एकमेकांविरुद्ध कट रचत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होत आहे.’

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा