• Sat. Jun 6th, 2026
    Eknath Shinde: फडणवीसांसमोरच सभागृहात शिंदेंचा आक्रमक अवतार; भाजप नेत्यांना फटकारलं, सातारा ZP बाबत गौप्यस्फोट

    मुंबई: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी महायुतीत जुंपली असून शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी या आपल्याच मित्रपक्षांना धोबीपछाड दिल्यानंतर आज अधिवेशनादरम्यान सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सदस्यांना मतदान करू न दिल्याचा प्रकार घडला असून लोकशाही गळा घोटण्याचं काम साताऱ्यात पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी आपला संताप व्यक्त केला. शिंदेंच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भूमिका मांडत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

    सातारा प्रकरणावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीबाबतची घटना सांगितली. या घटनेचा मी देखील साक्षीदार आहे. कारण जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर शंभूराज देसाई यांनी मला फोन केला होता. त्यांनी सांगितलं की, दोन सदस्यांवर ५-१० वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना अटक केली जाणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर मी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना फोन केला आणि सांगितलं की, हा काय प्रकार आहे? त्यावर दोशी यांनी सांगितलं की, हा गुन्हा दाखल झालाय, पण आपण त्यांच्यावर नंतर कारवाई करू. मी त्यांना म्हणालो की, उद्या मतदान आहे आणि आपल्याला कोणालाही मतदानापासून वंचित ठेवता येत नाही. कोर्टही अनेकदा मतदानासाठी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना परवानगी देतं. त्यामुळे या दोन सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही, मतदान झाल्यानंतर दाखल गुन्ह्याप्रकरणी काय कार्यवाही करायची, ती करा, असं मी सांगितलं. त्यावर पोलीस अधीक्षकही म्हणाले की, मी त्यांना मतदानापासून वंचित ठेवणार नाही. त्यानंतर मी आपले पोलीस महासंचालक दातेसाहेब यांनाही फोन केला आणि याबाबत सांगितलं. बहुमत हे शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्याकडे आहे, त्यामुळे ही दोन मतं कमी करण्यासाठी या लोकांकडून वेगळा प्रकार होऊ शकतो, असं मी दाते यांना सांगितलं. त्यानंतर दाते यांनी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून दोन्ही सदस्यांना मतदान करू देण्याच्या सूचना केल्या. मात्र तरीही मतदानाच्या दिवशी सदस्यांना मतदानापासून रोखण्यासाठी पोलीस तिथे थांबले होते,” असा दावा शिंदे यांनी केला.

    दरम्यान, “लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करू नका, असं मी पोलीस अधीक्षकांना सांगितलं. परंतु तरीही मी नंतर मीडियामध्ये पाहिलं, शंभूराज देसाईंनीही सांगितलं, तिथं पोलिसांनी मंत्री बघितले नाहीत, पदाधिकारी बघितले नाहीत, आमदार बघितले नाहीत, आरोपींना जसं पकडतात तसं यांना घेऊन गेले. त्याठिकाणी दोन सदस्यांना पोलीस घेऊन गेले आणि त्यांना मतदान करू दिलं नाही,” असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी पोलीस प्रशासनासह भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.

    मुख्यमंत्र्यांनी मांडली भूमिका

    एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील घटनेवरून नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली, “अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी जी वस्तुस्थिती सांगितली आहे, त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि या चौकशीच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed