• Fri. Mar 20th, 2026
    Akola Crime : ‘तू माझ्याकडे का पाहतोस?’; चहा टपरीवर वाद, तीन जणांचा हल्ला, 17 वर्षांच्या माविशचा जीव गेला

    अकोल्यातील डाबकी रोड परिसरात किरकोळ वादातून १७ वर्षीय मुलाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. अकोला पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

    अकोल्यात किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाचा खून, आरोपींना अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रियंका जाधव, अकोला : शहरामधील डाबकी रोड परिसरात गुरुवारी रात्री एका चहाच्या टपरीवर झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान एका भीषण हत्येत झाले आहे. “तू माझ्याकडे काय पाहतोस?” या साध्या कारणावरून झालेल्या वादातून तीन जणांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. माविश मोहम्मद आझम असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अकोला पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या ६ तासांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास डाबकी रोड रेल्वे स्टेशन परिसरात घडली. मृत माविश हा एका चहाच्या टपरीवर उभा असताना तिथे उपस्थित असलेल्या अन्य काही तरुणांशी त्याचा शाब्दिक वाद झाला. आरोपींनी “तू माझ्याकडे का पाहतोस?” असे म्हणत माविशशी हुज्जत घातली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी माविशला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान एका आरोपीने धारदार चाकू काढून माविशवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माविशला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    पोलिसांची जलद कारवाई

    घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची चार विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे, आरोपी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मार्गे मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून अवघ्या ६ तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

    Maharashtra TimesPune News : 11 महिन्यांचा संसार, वेगवेगळ्या देशात नोकरी, जोडपं पुणे कोर्टात, लग्न जुळवणाऱ्या माऊलींनीच घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली

    पोलीस अधीक्षकांचे आवाहन

    या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “या घटनेचा तपास सुरू असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शहरात शांतता राखावी.”

    सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींची पार्श्वभूमी तपासली जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा