Mumbai Mayor News: मारहाण प्रकरणात आरोपनिश्चितीसाठी पुरेसे पुरावे दिसत असल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायाधीशांनी रितू तावडे यांचा आरोपमुक्त करण्याचा अर्ज फेटाळून लावला.
२९ जुलै २०१६ रोजीच्या या घटनेप्रकरणी तावडे यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. पी. मानथकर यांनी त्यांचा अर्ज नुकताच फेटाळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, शास्त्री नगर, वाकोला, सांताक्रूझ पूर्व येथील या शाळेतील शिक्षिका शाहीन खान या कॅन्सरग्रस्त असूनही यांची अचानक वांद्रे-कुर्ला संकुलात बदली करण्यात आल्याने भाजपच्या तत्कालीन नगरसेविका रितू तावडे व अन्य काही जण नाराज होते. त्यामुळे तावडे व अन्य सहा जण मुख्याध्यापिक शरीफा मोमिन यांना जाब विचारण्यासाठी शाळेत गेले. त्यावेळी त्यांनी मुख्याधिपकांशी हुज्जत घातली आणि शाब्दिक चकमक वाढल्यानंतर रितू तावडे यांनी मोहम्मद याकुब रशीद व नदीम अहमद शेख या दोन शिक्षकांना कानशिलात लगावली.
‘मी त्याठिकाणी केवळ योगायोग म्हणून उपस्थित होते. कथित घटनेत गुन्हा करण्याचा कोणताही हेतू दिसत नाही. भाजप नगरसेविका असल्याने फिर्यादींनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्या त्या राजकीय दर्जाचा गैरफायदा घेतला. शिवाय कथित घटना घडल्यानंतर १३ दिवसांच्या विलंबानंतर हा एफआयआर नोंदवण्यात आला. त्यावरून फिर्यादींची पश्चातबुद्धी व राजकीय कुहेतू स्पष्ट होतो’, असा युक्तिवाद रितू तावडे यांच्यातर्फे न्यायालयात मांडण्यात आला. तर ‘घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि साक्षीदारही आहेत. तावडे यांनीच मारहाण केल्याचे पीडितांनी जबाबांत स्पष्ट म्हटले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवणे अभिप्रेत असताना त्यांच्याबाबत मारहाणीची घटना घडली. त्यामुळे याकडे गांभीर्याने पहायला हवे’, असा युक्तिवाद सरकारतर्फे सरकारी वकील इकबाल सोलकर यांनी मांडला. न्यायाधीशांनी दोन्ही बाजू तपासल्यानंतर, तावडे यांच्याविरोधात पीडित व अन्य साक्षीदारांनी थेट आरोप केल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच ‘आरोपनिश्चितीच्या टप्प्यावर न्यायालयाने जबाबांची विश्वासार्हता तपासणे अभिप्रेत नसते. आरोपनिश्चितीसाठी पुरेसे पुरावे दिसत आहेत. त्यामुळे अर्ज मान्य केला जाऊ शकत नाही’, असे स्पष्ट करत न्यायाधीशांनी तावडे यांचा अर्ज फेटाळून लावला.
