पुण्यातील वानवडी परिसरात कबुतर चोरीच्या संशयावरून १९ वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. ‘चोर-चोर’ ओरडत टोळक्याने तरुणाचे हातपाय बांधून त्याला बॅटने मारहाण केली.
नेमकी घटना काय?
कबुतर चोरीच्या संशयावरून १९ वर्षीय रुपेश शिंदे याला पकडून जमावाने एवढ्या भीषण पद्धतीने मारहाण केली की, त्यातच त्याचा मृत्यू झाला. १८ मार्चच्या पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास रुपेश आणि त्याचा मित्र अजय दुचाकीवरून जात होते. हडपसरमधील शंकर मठाजवळ थांबल्यानंतर ते पवार एन्क्लेव्ह परिसरातील कॅनाललगत असलेल्या मोकळ्या जागेत कबुतरांच्या पिंजऱ्याजवळ गेले. याच क्षणी श्वानांच्या भुंकण्याचा आवाज आला आणि काही सेकंदांतच परिस्थिती बदलली.
हातपाय बांधून रुपेशला मारहाण
“चोर… चोर…” असा आरडाओरडा करत काही जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. घाबरलेल्या रुपेशने जीवाच्या आकांताने पळ काढला. पण मुख्य रस्त्यावरील जिनमाता मोटर्ससमोर तो धावताना खाली पडला… आणि इथेच टोळक्याने त्याला गाठले. त्याचे हातपाय बांधले आणि त्यानंतर रुपेशला मारहाण सुरू केली. काही काळ त्याला बांधून ठेवून निर्दयी मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
दवाखान्यात बेबनाव
या मारहाणीत रुपेश गंभीर जखमी झाला. पहाटे त्यालाच मारहाण करणाऱ्यांनी दवाखान्यात दाखल केले; मात्र ‘अपघात झाला’ अशी खोटी माहिती देऊन हा प्रकार झाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, रुपेशसोबत असलेले त्याचे मित्र घटनास्थळावरून पळून गेले होते. त्यांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. तोपर्यंत दवाखान्यातून फोनही आला होता. वडिलांनी धाव घेतली, पण तोपर्यंत उशीर झाला होता… रुपेशचा मृत्यू झाला होता.
गुन्हा नोंद व आरोपींना अटक
या घटनेनंतर कुटुंबीयांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून काही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, फक्त संशय आला म्हणून एका तरुणाला पकडून बेदम मारहाण करून जीव घेतल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
