राज्यातील राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होत आहेत. यातील ४ जागा महाविकास आघाडीच्या आहेत. मविआच्या ४ खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. एकूण ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान होईल. महाविकास आघाडीकडे केवळ १ जागा जिंकण्याइतकं संख्याबळ आहे. मविआत शिवसेना उबाठाचे २०, काँग्रेसचे १६ आणि राष्ट्रवादी शपचे १० आमदार आहेत. त्यांची बेरीज ४६ च्या घरात जाते. राज्यसभेची १ जागा जिंकण्यासाठी ३७ मतांची गरज आहे.
काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत खासदार सुप्रिया सुळेंनी शरद पवारांच्या नावाची घोषणा केली. राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस, शिवसेना उबाठाच्या नेत्यांचे आभार मानले. ‘महाविकास आघाडीतील पक्षांची साथ कायम राहणार आहे. आम्ही पूर्ण ताकदीनं एकमेकांना साथ देऊ. काँग्रेस, शिवसेना उबाठाच्या नेत्यांनी मोठं मन दाखवलं, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार, बंटी पाटील यावेळी उपस्थित होते. पण शिवसेना उबाठाचा एकही नेता पत्रकार परिषदेला हजर नव्हता. या गैरहजेरीबद्दल सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर खासदार संजय राऊत आताच शरद पवारांना सिल्व्हर ओकवर येऊन भेटून गेले. त्यांनी तब्येतीची विचारपूस केली. उद्धव ठाकरेंनी उमेदवारीला पाठिंबा दिला. त्याबद्दल मी त्यांची आभार आहे, असं सुळे म्हणाल्या.
शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. पवारांच्या व्यतिरिक्त अन्य उमेदवार असता, तर भाजप प्रणित महायुतीकडून अतिरिक्त उमेदवार देऊन मविआची मतं फोडली जाण्याची शक्यता होती. विशेषत: काँग्रेस, शिवसेना उबाठाचा उमेदवार रिंगणात असता, तर मतांची फाटाफूट करण्याचे प्रयत्न झाले असते. तशी चर्चा गेल्या आठवड्यापासून सुरु होती.
शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीला ५९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत ते विधानसभा, लोकसभा, राज्यसभेवर अनेकदा निवडून गेले आहेत. विशेष म्हणजे या कालावधीत ते एकही निवडणूक हरलेले नाहीत. ते दोनदा राज्यसभेवर गेले आहेत. दोन्ही वेळा त्यांची निवड बिनविरोध झालेली आहे. त्यामुळे यंदाही पवार हाच ट्रॅक रेकॉर्ड कायम राखणार का, याची उत्सुकता आहे.