सातारा-पंढरपूर मार्गावर रानगव्याने धुमाकूळ घातल्याची घटना घडली. या रानगव्याने एका वृद्ध शेतकरीवर हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
फलटण तालुक्यातील कोकरेवाडी तसेच विडणी परिसरातील सातारा-पंढरपूर मार्गावर सकाळी लोकांना रानगवा फिरताना दिसला. बिथरल्याने तो नागरीकांवर हल्ला करण्यासाठी धावून जात होता. सायकलवरून आलेल्या राजेंद्र जाधव या वृद्ध शेतकऱ्याचा पाठलाग करत रानगव्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते रक्तबंबाळ झाले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने बारामतीला नेण्यात आले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत रानगवा रस्त्यावर फिरताना दिसतोय. यावेळी सायकलवर आलेले राजेंद्र जाधव हे स्वत:ला वाचवण्यासाठी रानगव्यापासून दूर जात होते. त्यांनी सायकल जमिनीवर टाकून जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. पण रानगव्याने त्यांच्या पाठिमागे धावत त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते प्रचंड जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर गावचे सरपंच सागर अभंग आणि डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ घटनेची माहिती दिली. तसेच रानगव्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली. परंतु, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘आम्ही गव्याला पकडू शकत नाही, फक्त हाकलू शकतो’, असे हतबल उत्तर दिले. मात्र, रानगवा लोकवस्तीत आल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत वन विभागाने रानगव्याला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू केले.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. शेतात जाताना समूहाने जावे आणि गव्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, रानगवा कुठून आला, हा प्रश्नही उपस्थित झाला. त्यावर खुलासा करताना फलटणचे वन क्षेत्रपाल दिगंबर जाधव म्हणाले की, खंडाळा, कोरेगाव, पुसेगाव भागातील डोंगरी भागात रानगवे आढळून येतात. त्या ठिकाणच्या कळपातील हा रानगवा पाण्याच्या अथवा चाऱ्याच्या शोधात आला असावा. कळपातून बाजूला झाल्यामुळे तो बिथरला असेल. नागरीकांनी सतर्क राहावे.
