Crime News: डोंबिवलीत एका तरुणीच्या बँक खात्यात तब्बल २ कोटी ६० रुपये जमा झाल्याच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणीनं पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एन्ट्री घेतल्यानं सगळ्या विषयाला राजकीय वळण मिळालं आहे. मनसेकडून पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. डोंबिवली गोग्रासवाडी भागात राहणारी निधी तिवारी ही विद्यार्थिनी कल्याणमधील महाविद्यालयात एमएस्सीचं शिक्षण घेते. निधीची मैत्रीण चांदनी सिंह आरबीएल बँकेत काम करते. आपल्याला बँक खाती उघडण्याचं टार्गेट असल्याचं सांगून चांदनीनं निधीची ओळखपत्रं, कागदपत्रं घेतली आणि तीन वेगवेगळ्या बँकेत तिची खाती उघडली.
खातं उघडण्यासाठी निधीनं चांदनीला काही पैसेदेखील दिले. यानंतर काही दिवसांनी निधीला तिच्या खात्यातून २ कोटी ६० लाख रुपये आणि दुसऱ्या खात्यामधून १० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचं कळलं. यामुळे तिला जबर धक्का बसला. निधीनं याबद्दल चांदनीकडे विचारणा केली असता तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे निधीनं स्वत: या प्रकरणातील सत्य शोधण्याचा प्रयत्न सुरु केला.
उत्तराखंडमधील सर्वसामान्य लोकांची फसवणूक करुन त्यातून मिळालेला पैसा निधीच्या खात्यात वळवण्यात आला होता. या सगळ्या रॅकेटमध्ये उल्हासनगरमधील एका व्यक्तीचा समावेश असल्याचं समोर आलं. त्यामुळे निधीनं या सगळ्याची माहिती पोलिसांना दिली. गेल्या ३ महिन्यांपासून निधी पोलीस ठाण्यात खेटे घालत आहेत. पण पोलिसांनी अद्याप तरी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा तिचा आरोप आहे.
पोलीस दाद देत नसल्याचं पाहून निधीनं मनसेचे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली आणि सगळा प्रकार त्यांच्या कानावर घातला. मुख्यमंत्री सायबर गुन्हे रोखण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करतात. मग एका विद्यार्थिनीसोबत इतका मोठा गैरप्रकार घडूनही त्यासंदर्भात कारवाई का करत नाहीत, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला. संशयित आरोपीला पोलीस ठाण्यात बोलावलं आणि कारवाई न करता का सोडून दिलं, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
