• Fri. Mar 6th, 2026

    Aditi Tatkare : ‘अजित दादा एकटे गेले नाहीत, आमचा रुबाब अन् माजसुद्धा सोबत घेऊन गेले’, आदिती तटकरेंच्या शब्दांनी सभागृह सुन्न

    Aditi Tatkare : ‘अजित दादा एकटे गेले नाहीत, आमचा रुबाब अन् माजसुद्धा सोबत घेऊन गेले’, आदिती तटकरेंच्या शब्दांनी सभागृह सुन्न

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोक प्रस्तावावर बोलताना मंत्री आदिती तटकरे या प्रचंड भावूक झाल्या. त्यांच्या भाषणाने संपूर्ण सभागृह सुन्न झालं. त्यांचे प्रत्येक शब्द सुन्न करणारे होते.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : “आपल्या प्रत्येकाचा एक नेता असतो. त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असतो. तो नेता आपला अभिमान असतो. तो नेता आपला माज असतो. एक चांगल्या पद्धतीने माज असतो. आमचा रुबाबदार नेता चालत यायचे, तो रुबाबदारपणा बघून आम्हाला अभिमान वाटायचा. आज जात असताना तो रुबाबदार नेता एकटा गेला नाही तर कार्यकर्ता म्हणून आमचा रुबाब आणि माजसुद्धा सोबत घेऊन गेला”, अशा शब्दांत मंत्री आदिती तटकरे यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी त्या ढसाढसा रडल्या. त्यांचे प्रत्येक शब्द सभागृहाला सुन्न करत होता. संपूर्ण सभागृह यावेळी सुन्न झालेलं होतं.

    “मला आठवतं 28 जून 2024 रोजी त्यांनी बजेट मांडलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यांनी जाहीर केली. त्यादिवशी जे गुलाबी रंगाचं जॅकेट त्यांनी घातलं होतं, खरंतर तो रंग त्यांचा आवडीचा असं नाही. पण ते जॅकेट घाललं, त्यानंतर आमच्या आग्रहाखातर तशे 12 जॅकेट शिवून घेतले. त्या जॅकेटवर ते आमच्या प्रचारासाठी यायचे”, अशी आठवण आदिती तटकरे यांनी सांगितली.

    आदिती तटकरे काय-काय म्हणाल्या?

    “सुनेत्रा काकूंच्या रुपाने आम्ही अजित दादांना पाहण्याचा प्रयत्न करतो. त्यांची जागा ही कधी कुणी भरुन काढणार नाही. कारण जरासे जरी रागावले, ओरडले तरी वडिलांसारखे रागावले असं वाटायचं. अनेकांनी त्याचा उल्लेख केला. ते थोडं ओरडून बोलले म्हणजे आपलं काम झालं किंवा आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी ते बोलत आहेत. आम्हाला कधी त्याबद्दल वाईट वाटायचं नाही. याउलट आम्हाला आनंद वाटायचा की, ते बोलले म्हणजे मी जवळची आहे, जवळचा आहे, अशा भावना आमच्या सर्वांच्या असायच्या”, असं आदिती म्हणाल्या.

    “अजित दादांवर आमचा सर्वांचा इतका विश्वास होता की, लोकसभेचा पराभव झाला तरी आमच्यातील कोण सुटलं नाही. ठिक आहे, एखाद्या निवडणुकीत पराभव होत असतो. पण तितक्याच ताकदीने आम्ही सर्वजण उभे राहिलो. कारण त्या नेतृत्वावर, त्या व्यक्तीवर आमचा विश्वास होता. आजही आमचा विश्वास आहे, ते जिथे कुठे असतील त्यांचं बारकाईने आमच्या सर्वांवर लक्ष आहे. त्यांच्या आमच्याकडून हीच अपेक्षा असणार आहे की, आपण सगळ्यांनी आपापल्या मतदारसंघात काम करावं. या सभागृहात त्यांनी अनेकदा उल्लेख केला की, आपण एकटे इथे उभे नसतो, आपण साडे तीन ते पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे आपण जबाबदारीने इथे वागलं पाहिजे. आमच्या सगळ्यांकडूनही त्यांच्या त्याच अपेक्षा राहणार. आमचा तोच प्रयत्न राहील. ज्या अपेक्षा त्यांनी ठेवल्या त्या आमच्याकडून पूर्ण करता याव्यात”, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

    “मी माझ्या भगवंताला आणि श्रीकृष्णाला प्रार्थना करेन की, ते जिथे कुठे असतील तुझ्यापाशी तिथलं उज्ज्वल स्थान त्यांना दे. आमच्या सगळ्यांच्या मनाच्या भावना तू त्यांच्यापर्यंत पोहोचव आणि त्यांना लवकर परत जन्म घेऊन या महाराष्ट्राच्या मातीतच पाठव. त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न ही पूर्ण करण्याची ताकद, क्षमता आणि पाठबळ आम्ही सर्वजण मिळून सुनेत्रा काकूंना देऊ. पण त्या व्यक्तीची जागा ही कुणीही भरुन काढू शकणार नाही हे दु:ख आणि खंत आमच्या सर्वांच्या मनात राहील”, अशा शब्दांत आदिती तटकरे यांनी भावना मांडल्या.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा