• Fri. Mar 6th, 2026
    Ajit Pawar : ‘उम्र भर का गम हमें इनाम दिया है’, हिंदी गाण्याचे शब्द बोलत जयंत पाटील भावूक

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील हे आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीने भावूक झाले. मुंबईच्या वरळी डोम येथे आयोजित शोकसभेत भाषण करताना जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : “अजित दादांच्या अनंत आठवणी मनात आहेत. हिंदीत सुप्रसिद्ध गाणं आहे. दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है उम्र भर का गम हमें इनाम दिया है”, असं म्हणत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांना रडू कोसळलं. त्यांना हुंदका दाटून आला. पण ते थांबले नाहीत. ते बोलत राहिले. मुंबईच्या वरळी डोम येथे अजित पवार यांच्या निधनानंतर शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. राज्यातील सर्व दिग्गज नेते या कार्यक्रमाला हजर होते. सर्व नेत्यांनी यावेळी अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी भाषण करताना जयंत पाटील हे भावूक झाले. त्यांना रडू कोसळलं. पण ते भाषणात न थांबता बोलत राहिले. त्यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या अनेक आठवणी सांगितल्या.

    जयंत पाटील काय-काय म्हणाले?

    “गेले जवळपास 38 वर्षे आम्ही एकत्रित काम केलं. क्लासमेट म्हटलं की, दहा-बारा वर्षींची साथ असते. पण मला आठवतं 1991 पासून आम्ही विधानसभेच्या एका वर्गात जवळपास शेजारी-शेजारी बसायचो. 1914 पासून तर शेजारी बसण्याचे प्रसंग अनेकदा आले. अजित दादांचे अनेक पैलू आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिले. माझ्याकडे तर प्रचंड आठवणी आहेत. खुल्या मनाचा, दिलदार मनाचा आणि विरोध करायचा असेल तर ठामपणाने करणारा नेता म्हणून आम्ही अजित दादांना अनुभवलं.””राजकारणात गोड बोलावं लागतं, सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं. असं मी त्यांना नेहमी सांगायचो. ते म्हणायचे, गोड बोलायचं मला जमत नाही. तो तुमचा मार्ग आहे. मी जे आहे तेच सांगणार. एखाद्या मीटिंगच्या आधी सांगितलं की, हे आमक्या जिल्ह्यातील तालुक्याचे येत आहेत, थोडं शांतीने घेऊ आणि मग हाताळू. मला सांगायचं आहे, ते मी आताच सांगणार. एवढा ठामपणा मी महाराष्ट्रातल्या, देशातल्या कुठल्याही नेत्यात बघितला नाही. जे असेल ते समोर आणि रोखठोक म्हणून अजित दादांबद्दल एक घोषणा असायची. एकच वादा, अजित दादा. ते खरंच होतं. महाराष्ट्रातील सगळीकडे जनतेला ही खात्री असायची आणि म्हणून जनता ही घोषणा द्यायची.”

    “अजित दादांचं महाराष्ट्राचं घडवण्याचं आणि महाराष्ट्रातलं राजकारण घडवण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी हळूहळू पुन्हा मैदान तयार करावं, हळूहळू संघटना आणखी जोरदारपणे पुन्हा वाढवावी आणि एकसंघपणाने अधित ताकदीने काम करावं या विचारांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पाहत असतानाच नियतीने मोठा घात केला.”

    “मी दादांना अलिकडच्या काळात फार जवळून पाहिलं. प्रचंड महत्त्वकांक्षी आणि कुठल्याही आव्हानाला तोंड देण्याची मानसिकता असणारे दादा मी फार जवळून बघितले. त्यामुळे मला असं म्हणावं लागतंय की, प्रचंड मोठ्या महत्त्वकांक्षेची राखरांगोळी झाली. आज अजित पर्वाचा अस्त झाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं म्हणजे वाऱ्यासारखा महाराष्ट्रभर फिरणारा दादा एका क्षणात शांत कसा झाला? हे आजही महाराष्ट्राला कोडं आहे.”

    “अजित दादांना टापटिप आवडायची. पण व्यक्तीगत संबंध अजित दादा फार सुरेख सांभाळायचे. मी पक्षाचा अध्यक्ष असताना अनेक असे प्रसंग आहेत, एखाद्या मतदारसंघात एखादी गोष्ट करायची असेल तरी दादांचा फोन यायचा. मतभेद झाले तरी मला हेच वाटतं असं सांगून फोन ठेवायचे. स्वत:चं मत मांडायला दादा कधी कचरले नाहीत.”

    “आम्ही एका पक्षात फार वर्षे काम केलं. काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. शरद पवार यांचे प्रचंड मोठे त्यांच्यावर संस्कार होते. मी अलिकडच्या काळात फार जवळून बघितलं की, शरद पवारांचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम होतं. आजही शरद पवारांचा हुकमी एक्का अजित पवारच होते. एवढा अजित पवारांच्या कामगिरीवर शरद पवारांचा विश्वास होता.”

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा