अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारची पत्रकार परिषद पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्वात आधी सुनेत्रा पवार यांनी भूमिका मांडली.
“उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्याची जुनी परंपरा आहे. चहापानाचा कार्यक्रम केवळ अनौपचारिक नसतो तर संवादाचा मंच असतो. या मंचावर राज्याच्या विकासावर चर्चा व्हावी, जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचावेत आणि त्यातून मार्ग निघावेत, अशी अपेक्षा असते. यंदाचे अधिवेशन हे महायुतीच्या सरकारचे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. जनतेने मोठ्या विश्वासाने गेल्या वर्षी पुन्हा एकदा महायुतीला सत्ता दिली. त्या विश्वासाने न्याय देण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
“अजित दादांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत वानखेडे साहेबांनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान अजित दादा यांना मिळाला आहे. अजित पवार यांनी 2011 मध्ये सादर केलेला पहिला अर्थसंकल्प हा 1,44,783 कोटी रुपयांचा होता. तर मागच्या वर्षी त्यांच्या कारकीर्दीतील शेवटचा अर्थसंकल्प 7,20,000 कोटी रुपयांपर्यंच पोहोचला. या अर्थसंकल्पीय आकारमानात झालेली भरीव वाढ ही केवळ आकड्यांची वाढ नाही तर महाराष्ट्राला सर्वांगीण विकासाकडे नेण्याचं प्रगतीचं द्योतक आहे”, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
“अजित दादांनी विकासाच्या वेगात सुद्धा राज्याच्या आर्थिक शिस्तशी कधीही तडजोड केली नाही. विकास आणि शिस्त याचा समतोल राखत महाराष्ट्राला सक्षम करण्याचं काम त्यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीने अजित पवार यांच्या अर्थसंकल्पाची सुरुवात झाली होती. मात्र यंदाचा अर्थसंकल्प हा त्यांच्या कारकीर्दीतला 12 वा अर्थसंकल्प ठरला असता. पण अचानक आपल्याला सोडून ते गेले. यापूर्वीत अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची केलेली तयारी अंतिम टप्प्यात नेली आहे”, अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढे नेण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न होता. त्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. आर्थिक शिस्त आणि नियोजनपूर्वक विकास यांच्यातील समतोल हेच त्यांच्या कामाचे सूत्र होते”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
“यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करतील. हा अर्थ संकल्प राज्याच्या प्रत्येक घटकाला पुढे नेणारा असेल, न्याय देणारा असेल याचा मला ठाम विश्वास आहे. महायुती सरकार पुन्हा निवडून आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होईल, अशी टीका झाली. पण अजित पवार यांनी योग्य आर्थिक नियोजन करुन या योजनेसाठी निधीची कमतरता कधीच भासू दिली नाही. माझं हे पहिलेच अधिवेशन आहे. अत्यंत चांगल्याप्रकारे अधिवेशन चालेल अशी मला खात्री आहे”, अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी यावेळी मांडली.
