Ajit Pawar Plane Crash: विमानात इंधनाचे अधिकचे टँक होते, परत मुंबईला जाण्याऐवजी हे विमान मुद्दाम खाली आदळण्यात आलं, असं म्हणत रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत.
रोहित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत म्हटलं की, “अजितदादांच्या विमानाचा इतका मोठा स्फोट का झाला? याबाबतीत आम्ही शंका उपस्थित केली होती ती आता खरी ठरत आहे. या विमानात अधिकचे इंधन टँक होते. हे इंधन टँक कुठे असते तर जिथे विमानात शेवटच्या भागात टॉयलेट असते ते टँक ठेवण्याची जागा असते. त्याच्या मागच्याच भागात ब्लॅक बॉक्स असतो. त्यामुळे आधी कॅन पेटले आणि त्यानंतर विमानाच्या पंखांमध्ये असलेल्या इंधनाने पेट घेतला. विमानाने मुंबईहून उड्डाण घेत असताना त्याचे इंधन टँक पूर्णपणे भरलेले होते. बारामतीला जाण्यासाठी विमानात इतके इंधन का भरण्यात आले होते? त्यामुळे मी आधी म्हटल्याप्रमाणे पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातावेळी स्फोट मोठा होण्यासाठी इंधन जास्त भरण्यात आले, ही जी आमच्या मनात शंका होती, ती आता खरी होताना दिसत आहे,” असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला आहे.
घातपाताचा संशय का? रोहित पवार म्हणाले…
विमान अपघाताबाबत विविध शंका उपस्थित करत रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. “फ्लाइटचा जो प्लॅन आहे त्यानुसार तुम्हाला लँडिंगसाठी मूळ विमानतळासह आणखी एक पर्यायी विमानतळ द्यावं लागतं. पुणे विमानतळ हे फ्लाइट प्लॅनमध्ये पर्याय म्हणून देता आलं नसेल कारण तिथं सकाळी डिफेन्सच्या विमानाचं लँडिंग होतं. विविध अडचणींमुळे सोलापूरचाही पर्याय देता येत नाही. म्हणजे पुन्हा मुंबई विमानतळाचाच पर्याय तुम्हाला द्यावा लागणार होता. मग आमचा प्रश्न असा आहे की, विमान लँडिंगसाठी किमान दृश्यमानता ही ५००० इतकी असावी लागते जी बारामतीत त्या दिवशी केवळ ३००० इतकी होती, तरी मग मुंबईतून उड्डाण का करण्यात आलं? आणि उड्डाण जरी केलं तरी दृश्यमानता कमी आहे हे कळाल्यावर लँडिंगचा प्रयत्न करायलाच नव्हता पाहिजे,” असं म्हणत रोहित पवारांनी हा घातपात असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, “तपासाला मुद्दाम उशीर केला जातोय आणि आता व्हीएसआर या कंपनीकडून नवीन कागदपत्रे तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे तपास करताना फ्लाइट प्लॅनची माहिती घेताना कागदपत्रे न बघता ई मेल किंवा सीसीटीव्ही फुटेजसह डिजिटल प्रुफ पाहिजे, अशी आमची मागणी आहे,” असंही रोहित पवार म्हणाले.
