• Fri. Mar 6th, 2026

    Jay Pawar: ‘ब्लॅक बॉक्स इतक्या सहज नष्ट होत नाही’; अजित पवार अपघातावर जय पवारांचे गंभीर प्रश्न

    Jay Pawar: ‘ब्लॅक बॉक्स इतक्या सहज नष्ट होत नाही’; अजित पवार अपघातावर जय पवारांचे गंभीर प्रश्न

    अजित पवारांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न असतानाच, त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मोठी मागणी केली आहे.

    विमान अपघातात ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाही; जय पवारांची पोस्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला असतानाच, आता या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांहीनी या अपघाताच्या चौकशीबाबत अत्यंत मोठी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, ज्या कंपनीच्या विमानाने हा अपघात झाला, त्या व्हीएसआर (VSR) कंपनीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी जय पवार यांनी लावून धरली आहे.

    जय पवार यांचा मोठा दावा

    वडिलांच्या निधनानंतर जय पवार यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवरून या प्रकरणातील संशयास्पद बाबींवर बोट ठेवले आहे. जय पवार म्हणाले की, “विमान अपघातात ‘ब्लॅक बॉक्स’ इतक्या सहजपणे नष्ट होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.” जय पवारांच्या या पोस्टमुळे हा अपघात तांत्रिक त्रुटीमुळे झाला की हा घातपात आहे, या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

    कंपनीच्या चौकशीची मागणी

    ज्या व्हीएसआर कंपनीचे विमान अजित पवार यांनी वापरले होते, त्या कंपनीच्या कामकाजावर जय पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “व्हीएसआरच्या विमान उड्डाणांवर तात्काळ बंदी घाला आणि त्यांच्या सर्व गैरव्यवहारांची सखोल व निष्पक्ष चौकशी करा,” अशी मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत सत्य समोर येत नाही, तोपर्यंत या कंपनीला उड्डाणाची परवानगी नसावी, असाही पवित्रा जय पवारांनी घेतला आहे.

    Maharashtra TimesNCP Meger: राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेत खासदार अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले ’14 बैठका झाल्या…’

    रोहित पवारांच्या दाव्याने वाढली होती खळबळ

    काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या अपघाताबाबत धक्कादायक दावे केले होते. हा अपघात नसून एक ‘घातपात’ असू शकतो, अशी ठाम भूमिका रोहित पवार यांनी मांडली होती. आता जय पवार यांनीही ब्लॅक बॉक्सबद्दल उपस्थित केलेले प्रश्न रोहित पवारांच्या संशयाला बळकटी देणारे ठरत आहेत.

    Maharashtra TimesMaharashtra Politics: मोठी उलथापालथ! भाजपला झटका, नगरसेवकांचा काँग्रेसला पाठिंबा; सत्ता पेच सुटला, समीकरणं फिरली

    कुटुंबातील सदस्यानेच आता चौकशीची मागणी केल्यामुळे सरकारवर दबाव वाढला आहे. जय पवार यांनी मागणी केलेली ही निष्पक्ष चौकशी कधी सुरू होणार आणि या अपघातामागचे नेमके सत्य काय आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा