• Fri. Mar 6th, 2026
    Raj Thackeray: ‘नरेंद्र मोदींच्या भीतीमुळे…’; राज ठाकरे मोहन भागवतांवर बरसले, प्रश्नांची सरबत्ती करत खरपूस समाचार

    Mohan Bhagwat: “संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, मात्र त्यांनी अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा वमग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी मोहन भागवतांना सुनावलं आहे.

    मोदींचं नाव घेत राज ठाकरे मोहन भागवतांवर बरसले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबईतील वरळी येथील नेहरू केंद्राच्या सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त कोकण प्रांताने ‘संघ यात्रा के १०० वर्ष- नए क्षितिज’ या विषयावर सरसंघचालक मोहन भागवत यांचे व्याख्यान रविवारी आयोजित केलं होतं. या व्याख्यानादरम्यान मोहन भागवत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत भागवत यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. “भाषेबद्दल आग्रही राहणं, त्यासाठी आंदोलन करणं हा एक आजार असल्याचं विधान मोहन भागवतांनी केलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आलं होतं, त्यातले काही हजर देखील होते. मात्र मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती. अन्यथा आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या,” असं म्हणत सोशल मीडिया पोस्टमधून राज ठाकरेंनी मोहन भागवत यांच्यावर हल्लाबोल केला.

    मोहन भागवत यांचा वक्तव्याचा समाचार घेताना राज ठाकरे पुढे म्हणाले की, “मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत पडायचंच कशाला?” असा खरमरीत सवाल राज यांनी उपस्थित केला आहे.

    राज ठाकरेंनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

    मोहन भागवत यांनी भाषेवरून होणाऱ्या आंदोलनांवर निशाणा साधल्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भूमिका मांडली आहे. “भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा, असं आम्ही समजतो. भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे. दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे. ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेव्हा देशातील ४-५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत?” असं राज ठाकरेंनी भागवत यांना उद्देशून म्हटलं आहे.

    दरम्यान, “यामध्ये हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार? असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे. या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच. हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील,” असंही राज ठाकरेंनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा