• Mon. Jun 15th, 2026

    मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार, मी कोण ते! शिंदेंचा शिलेदार थेट नडला; सर्व जागा जिंकत भाजपला धक्का

    मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार, मी कोण ते! शिंदेंचा शिलेदार थेट नडला; सर्व जागा जिंकत भाजपला धक्का

    Sangli Khanapur ZP Election Result 2026: सांगलीतील खानापुरमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं भाजपला जबर धक्का दिला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सांगली: माझ्यासारखे २४२ आमदार आहेत, म्हणून तुझा मुख्यमंत्री बसला आहे, अशा शब्दांमध्ये भाजपला आव्हान देणारे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी जिल्हा परिषदेचा गड राखला आहे. मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार, मी कोण आहे, अशी भाषा बाबर यांनी प्रचारसभेत वापरली होती. त्यामुळे खानापूर जिल्हा परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली. खानापुरातील निवडणूक निकालाकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष होतं. या संघर्षात शिंदेसेनेनं बाजी मारली आहे.

    खानापुरातील जिल्हा परिषदेच्या चारही जागा आणि पंचायत समितीच्या आठही जागा शिंदेसेनेनं जिंकल्या. इथे भाजपला भोपळाही फोडता आलेला नाही. आमदार सुहास बाबर यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत भाजपला थेट अंगावर घेतल्यानं खानापुरातील निवडणूक निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. इथे शिंदेसेनेनं ताकद दाखवून दिली आहे. जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागा बाबर यांनी पक्षाला जिंकून दिल्या आहेत. तर भाजपची पाटी कोरी राहिली आहे.

    आमदार सुहास बाबर यांच्या वहिनी डॉ. शीतल बाबर या नागेवाडी जिल्हा परिषद गटातून निवडून आल्या. खानापूर तालुक्यात बाबर यांनी पक्षाला दणदणीत विजय मिळवून दिला. यानंतर शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खानापुरात भाजप ची पाटी कोरी राहिली आहे. भाजप राज्यभरात मुसंडी मारत असताना खानापुरात बाबर यांच्या माध्यमातून शिंदेसेनेचं वर्चस्व राखलं आहे.

    निवडणुकीच्या प्रचार सभेत आमदार सुहास बाबर यांनी भाजपला थेट लक्ष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर तोफ डागली. खानापुरात दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस आपणच चालवतो, असं विधान बाबर यांनी केला. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बाबर यांना समज द्यावी. त्यांच्या आमदारकीची पहिली टर्म शेवटची ठरु नये, अशा शब्दांमध्ये मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी संताप व्यक्त केला. खानापुरातील निकालानंतर बाबर भाजपला जड गेल्याची चर्चा आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा