• Wed. Jul 1st, 2026

    अजितदादांच्या निधनानंतर पहिलीच निवडणूक

    ByMH LIVE NEWS

    Feb 9, 2026
    अजितदादांच्या निधनानंतर पहिलीच निवडणूक
     पुणे 
    पुणे जिल्हा परिषदेवर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी’कडून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार होऊ शकला नाही. भाजपने बाहेरून नेत्यांना प्रचारासाठी पाठवले नाही; तरीही जिल्ह्यात झालेले मतदान आणि सध्याची परिस्थिती पाहता जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

    अजितदादांच्या झंझावाताशिवाय निवडणूक

    अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे पुण्यासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली. बारामती दु:खात बुडाली आहे. स्थानिक नेत्यांसह उमेदवारांकडून निवडणुकांचा प्रचार करण्यात आला. उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. अजितदादांच्या झंझावाताशिवाय ही निवडणूक खऱ्या अर्थाने निवडणूक वाटलीच नाही. निवडणुकीत रंगत भरलीच नाही. अन्य तालुक्यांत स्थानिक पातळीवर निवडणुका लढविल्या गेल्या आहेत.

    कुठे काय स्थिती?

    अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतांच्या रूपाने सहानुभूती मिळाली, की नाही, हे आता मतमोजणीनंतरच चित्र स्पष्ट होईल. जिल्ह्यात पुरंदरमध्ये भाजप, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी; जुन्नरमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी; खेडमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आव्हान आहे. भोरमध्ये ‘राष्ट्रवादी’समोर भाजपचे आव्हान कायम राहिले. मावळात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असेच चित्र आहे. दौंडमध्ये ‘राष्ट्रवादी’चे प्राबल्य असले, तरी आमदार राहुल कुल यांनी आता भाजपचा विस्तार करण्याची भूमिका घेतल्याने त्यांनी कंबर कसली होती.

    सन २०१७ मध्ये ७५ गट होते. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक ४४ जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी सात जागा आणि शिवसेनेला १३ जागा मिळाल्या होत्या. त्याशिवाय इतर गटांना चार जागा मिळाल्या होत्या. त्या वेळी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला होता. यंदाही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दादांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळतील, भाजपचे संख्याबळ वाढेल का; तसेच काँग्रेस सेनेची काय स्थिती असेल, याबाबत आता गावागावांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहेत.

    विजयी मिरवणुका न काढण्याचे आवाहन

    अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे जिल्हा परिषदेची ही पहिलीच निवडणूक त्यांच्याशिवाय लढली गेली. या निवडणुकीचा आज, सोमवारी (नऊ फेब्रुवारी) निकाल लागणार असून, जिल्ह्यात कोणाचे वर्चस्व याचे चित्र स्पष्ट होणार आहे. निकालानंतर कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी विजयी मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘वॉर रूम’कडून करण्यात आले आहे.
    ‘दादांच्या अपघाती निधनाने आपण सर्व जण अजून दु:खातून पूर्णपणे सावरलो नाही. आज मतमोजणी आहे. निकाल काहीही असो, या दुःखद पार्श्वभूमीची जाणीव ठेवून आपण सर्वांनी संयम, शिस्त आणि संवेदनशीलता दाखवणे गरजेचे आहे. कोणीही विजयी मिरवणूक, गुलाल उधळणे, फटाके किंवा जल्लोषाचे प्रकार करू नयेत,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले. आपली शिस्त, संस्कार आणि दादांप्रती असलेला आदर यातूनच दिसून येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed