• Tue. Mar 10th, 2026

    Uddhav Thackeray : राजकारणात मोठ्या हालचाली घडण्याची शक्यता, उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार? संख्याबळ काय सांगतं?

    Uddhav Thackeray : राजकारणात मोठ्या हालचाली घडण्याची शक्यता, उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार? संख्याबळ काय सांगतं?

    उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे ते आता पुन्हा विधान परिषदेवर जाणार का? हे पाहणं औत्सुक्याचं आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यणंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ हा 13 मे 2026 ला संपणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. विशेष म्हणजे यावर प्रतिक्रियादेखील येऊ लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ हा लवकरच संपणार आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने त्यांची कोंडी होणार असल्याचं चित्र आहे.

    संख्याबळाच्या कमतरतेमुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी विधान परिषदेची निवडणूक जिंकणं हे मोठं आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे संख्याबळ पाहता विधान परिषदेच्या 9 जागांपैकी महाविकास आघाडीला केवळ एकच जागेवर यश मिळू शकतं. ती एक व्यक्ती उद्धव ठाकरे असतील का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे हे स्वत: विधान परिषदेवर जाणार की दुसऱ्या कुणाला संधी देणार? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.

    संजय राऊत काय म्हणाले?

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेवर जाण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांना विनंती केल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं, अशी आमची सर्वांची इच्छा आहे, असंदेखील संजय राऊत म्हणाले. तसेच विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत मविआला एकमेकांना मदत करावी लागेल, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

    शिंदेंच्या शिवसेनेचं म्हणणं काय?

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील याबाबतच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. “उद्धव ठाकरे यांना विधीमंडळात जाण्यासाठी आता मध्ये कुठली निवडणूक नाही. विधीमंडळात जायचंच असेल तर विधानसभेचं मागचं दार ज्याला म्हणतात त्या विधान परिषद निवडणुकीचा पर्याय त्यांना आहे. मला वाटतं ते त्या मार्गाने परत विधान परिषदेवर जातील. संख्याबळाचं गणितं पााहता इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला तर ते विधान परिषदेत जातील”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

    संख्याबळानुसार नेमकं गणित काय?

    विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संख्याबळ पाहिलं तर महायुतीकडे 235 आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे 7 आमदार सहज निवडणुकीत जिंकून येण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडे माकप आणि शेकापचे पकडून 48 आमदार आहेत. तसेच अन्य दोन पक्षांचेदेखील आमदार आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे विधानसभेचे 20 सदस्य आहेत. त्यांनी राज्यसभा निवडणुकीत एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार किंवा काँग्रेसला पाठिंबा दिला तर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा