कोल्हापुरात भरधाव कारने तीन दुचाकींना धडक दिली. या घटनेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे कोल्हापूर शहर हादरलं आहे.
भरधाव कारमुळे घडला अपघात
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजारामपुरीकडून कोटीतीर्थाकडे जाणारी एक क्रेटा कार अत्यंत बेदरकारपणे वेगाने धावत होती. शाहू मिल चौकातील वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने समोरच्या तीन दुचाकींना प्रचंड जोराने धडक दिली. यावेळी दीपक महादेव वंशे (वय 66) आणि त्यांची मुलगी ॲड. भाग्यश्री लक्ष्मण गवळी (वय 30) हे बाप-लेकी दुचाकीवर होते. कारच्या भयंकर धडकेने ते हवेत उडून दूरवर पडले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. इतर जखमी कैवल्य उदय नाईक आणि धनंजय करंजकर यांना रुग्णवाहिकेने तात्काळ रुग्णालयात नेले गेले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. “जखमींना लगेचच रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर कारचालक मयुरेश पाटील याला ताब्यात घेतले आहे. या अपघाताबाबत अधिकचा तपास पोलिसांकडून सुरु आहे”, अशी माहिती शहर पोलीस उप अधीक्षक प्रिया पाटील यांनी सांगितले आहे.
दुचाकींचा चक्काचूर, कार रस्त्यावर पलटी
अपघातानंतर घटनास्थळी एकच हाहाकार उडाला होता. कार रस्त्याच्याकडेला पलटी झाली होती. तर कारने ठोकलेल्या तीन दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. अचानक झालेल्या या भयानक अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. काहींनी मदतीसाठी तत्काळ धाव घेतली. पोलिसांनी माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सावरण्यासाठी पलटलेली कार आणि अपघातग्रस्त दुचाक्या बाजूला केल्या. शाहू मिल चौक ते कोटीतीर्थ तलाव रस्ता गर्दी आणि गोंधळामुळे काही वेळ पूर्णपणे बंद झाला होता, वाहतुकीचा प्रचंड गोंधळ उडाला. या अंगाचा थरकाप उडवणारे ते दाहक दृश्य होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
या अपघातात मृत्यू पावलेले दीपक वंशे (रा. सनगर गल्ली, दिलबर तालीम मंडळाजवळ) हे कोल्हापूर महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. आरोग्य विभागात त्यांनी दीर्घकाळ सेवा केली होती. तर त्यांची मुलगी भाग्यश्री ही वकील होती. दीड वर्षांपूर्वी विवाहानंतर ती कसबा बावडा येथे जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सासरी राहत होती. या अपघाताने दोघांचे कुटुंब शोकाकुल झाले आहे.
दरम्यान शाहू मिल चौक परिसर हा शहरातील प्रमुख चौकांपैकी आणि वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक असल्याने इथे नेहमी गर्दी असते. तरी कोल्हापुरात चालकांच्या बेदरकारपणामुळे असे अपघात वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत कोल्हापुरात वाढलेल्या अपघातांनी नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून वेग नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
