• Sat. Sep 19th, 2026

औरंगजेब, अकबर, बाबर, बिरबल यांच्याबद्दलच सतत का बोलतो, असा सवाल अभिनेता सुनील शेट्टीने उपस्थित केला

ByMH LIVE NEWS

Feb 6, 2026
औरंगजेब, अकबर, बाबर, बिरबल यांच्याबद्दलच सतत का बोलतो, असा सवाल अभिनेता सुनील शेट्टीने उपस्थित केला

मुंबई – प्रतिनिधी

अभिनेता सुनील शेट्टीने 2025 मध्ये ‘केसरी वीर’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. गुजरातमधील सोमनाथ मंदिर वारंवार उद्ध्वस्त केल्याच्या कथेवर आधारित हा चित्रपट होता. परंतु या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे प्रदर्शनाच्या अवघ्या काही दिवसांतच हा चित्रपट थिएटरमधून काढून टाकण्यात आला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनील शेट्टीने चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या का यशस्वी झाला नाही, याबद्दलचा खुलासा केला. हिंदी सिनेसृष्टी कोणत्या प्रकारच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर लक्ष केंद्रीत करतेय, याबद्दलही त्याने आपले विचार मांडले. ‘केसरी वीर’ हा चित्रपट बनवण्यापूर्वी सोमनाथ मंदिराचा इतिहास समजून घेण्यासाठी बरंच संशोधन करण्यात आलं होतं. परंतु योग्य वितरणाचा अभाव हा त्याचा सर्वांत मोठा दोष असल्याचं त्यांनी म्हटलंय.

“आम्ही चित्रपट बनवण्यापूर्वी बरंच संशोधन केलं होतं. परंतु दुर्दैवाने चित्रपटाचं वितरण योग्यरित्या झालं नव्हतं. डिस्ट्रीब्युशन हा एक मोठा खेळ आहे. आम्हाला थिएटरच मिळाले नाहीत. निर्मात्याने स्वत: लोकांमध्ये त्याचं वितरण केल्यामुळे खूप पैसा गमावला आणि ते काही कामी आलं नाही. या सर्व कारणांमुळे एक चांगला चित्रपट वाया गेला. आपण औरंगजेब, अकबर, बाबर, बिरबल यांच्याबद्दलच सतत का बोलतो? आपला इतिहास आपल्या संस्कृतीबद्दल सांगणारा असला पाहिजे. आपल्या चित्रपटांमध्ये वेदांबद्दल, राजपूतांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, प्रत्येक राज्यातील प्रत्येक नायकाबद्दल बोललं पाहिजे. सोमनाथ मंदिराबद्दल मी अत्यंत भावनिक आहे. कितीतरी वेळा ते उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. पण ते अजूनही उभं आहे”, असं सुनील शेट्टी म्हणाला.

याआधी अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या ‘पृथ्वीराज चौहान’ या चित्रपटाचं प्रमोशन करतानाही असंच मत व्यक्त केलं होतं. “दुर्दैवाने आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याबद्दल फक्त दोन ते तीन ओळीच आहेत, परंतु आक्रमकांबद्दल बरंच काही लिहिलं गेलंय. आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या महाराजांबद्दल फारसं काही सांगितलेलं नाही. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याबद्दल इतकं काही आहे की आपल्याला त्यातलं बरंच काही माहीत नाही. हे पाहून मला आश्चर्य वाटतं”, असं अक्षय म्हणाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *