• Wed. Aug 12th, 2026

    आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प – मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 1, 2026
    आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प – मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद

    मुंबई, दि.१: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी सादर केला आहे. जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण होण्याच्या दृष्टीने पावलं पुढं पडत असून ७.४ टक्के विकास दराचे उद्दिष्ठ गाठण्याचा या २०२६-२७ या अर्थसंकल्पीय वर्षात प्रयत्न होणार आहे अशी प्रतिक्रिया कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केली.

    मंत्री श्री लोढा म्हणाले की,देशातील मध्यमवर्ग, गरीब आणि शेतकऱ्यांना समृध्द करणारा हा अर्थसंकल्प आर्थिक प्रगतीचे शिखर गाठणारा ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक AI तंत्रज्ञान विकसित करून अत्याधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. ‘ बायो फार्मा मिशन’ औषधांच्या केवळ किमती कमी करणारे नाही तर, जागतिक औषध बाजारपेठेत भारत एक औषध निर्मितीचे ग्लोबल हब होणार आहे.

    त्याचबरोबर या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रावर ही भर देण्यात आला असून पाच नव्या विद्यापीठासह तीन आयुर्वेदिक महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. या निमित्ताने भारतीय आयुर्वेद शास्त्र जगातल्या कानाकोपऱ्यात पोहचवले जाणार आहे. या घोषणेसह डिजिटल आणि क्रिएटिव्ह स्किल्स वाढवण्यासाठी सरकारने एबीजीसी कंटेंट क्रिएटर लॅब सुरु करण्याची योजना आखली आहे.या अनुषंगाने १५ हजार माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयात कंटेंट क्रिएटर लॅबची सुरुवात होणार आहे. ज्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान कौशल्य शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच उच्च शिक्षण संस्थांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहे बांधण्याची घोषणा देखील  केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली आहे.

    मोठ्या शहरांसह छोट्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्यात येणार आहेत. देशभरात सात  हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्यात येणार असून यात मुंबई आणि पुणे ही जोडण्यात येणार असल्याने महाराष्ट्रातील व्यापारी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होणार आहे. तसेच तरुणांना  रोजगाराच्या संधी सह एमएसएमई (MSME) क्षेत्राला जागतिक स्तरावर अग्रणी बनवण्यासाठी सहा धोरणात्मक क्षेत्रांमध्ये मोठा बदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे.  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकासाच्या दूरदृष्टीने परिपूर्ण असा अर्थसंकल्प अर्थमंत्री श्रीमती सीतारामन यांनी मांडला असून  भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात योगदान देणारा हा अर्थसंकल्प आहे.

    0000

    संध्या गरवारे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed