उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्य सरकारमध्ये निर्माण झालेल्या पोकळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात गुरुवारी रात्री सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. मुंबई महापालिकेतील महापौरपदाच्या निवडीचा निर्णय आता तातडीने करण्याऐवजी तो आणखी काही दिवस लांबणीवर टाकण्याबाबतही यावेळी चर्चा झाल्याचे समजते.अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्यातील युती सरकारला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याकडे असलेल्या महत्त्वाच्या खात्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. याशिवाय अजित पवार ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणीही काहीसा संपर्क तुटणार आहे. अशावेळी वेळीच याबाबत योग्य त्या हालचाली करण्यासाठी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांमध्ये ही चर्चा झाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षनेता निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशावेळी त्यांच्याकडून येणाऱ्या प्रस्तावांना तसेच, त्यांच्या कोट्यातील मंत्र्यांच्या खातेबदलाचा वा अन्य काही प्रस्ताव आल्यास त्यातून योग्य मार्ग काढण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे कळते.४ वा ५ जानेवारीला निर्णय घेण्याची तयारी सुरू होती. त्यानंतर लगेचच दोन ते तीन दिवसांनी कोकणात अंगणेवाडीची जत्रा असल्याने अनेक नगरसेवक तिकडे दर्शनासाठी जातात. त्यासाठीच त्यापूर्वी महापौरपदाची निवडणूक पार पडणार होती. मात्र आता अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे हा निर्णय काहीसा लांबणार असल्याचे समजते. दरम्यान, शिवसेना, भाजपमध्ये मतभेद असल्याने हा विलंब होत असल्याचा दावा शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी केला.‘ही राऊत यांची हीन वृत्ती’
‘अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसाचा शासकीय दुखवटा आहे. अशा परिस्थितीत राऊत यांना महापौर निवडीची घाई झाली आहे. शासकीय दुखवटा असताना महापौरपदासाठी बैठका घेणे, महापौर आमचा का तुमचा याबद्दल चर्चा करण्याची हीन वृत्ती राऊतांची आहे. मुंबई महापालिकेचा महापौर हा भाजप महायुतीचा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील आठवड्यामध्ये त्याबद्दलचा निर्णय घेतील’, अशी प्रतिक्रिया भाजपच्या माध्यम विभागचे प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी दिली.