• Mon. Jun 15th, 2026

    संकटमोचकच संकटात? महाजनांविरोधात वनरक्षकांचा आक्रमक पवित्रा; म्हणाल्या, कायदा आड येतो म्हणून ते…

    संकटमोचकच संकटात? महाजनांविरोधात वनरक्षकांचा आक्रमक पवित्रा; म्हणाल्या, कायदा आड येतो म्हणून ते…

    नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळल्याने मंत्री गिरीश महाजन वादात सापडले आहेत. वनसंरक्षक माधुरी जाधव यांनी यावर आक्षेप घेत महाजन यांना जाब विचारला आणि पोलीस तक्रार दाखल केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक: प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळल्यानं मंत्री गिरीश महाजन वादात सापडले आहेत. आंबेडकरांचा उल्लेख न केल्यानं वनसंरक्षक माधुरी जाधव यांनी आक्षेप नोंदवत महाजन यांना जाब विचारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला. या प्रकरणी जाधव यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे संकटमोचक असलेले महाजन स्वत:च संकटात सापडले आहेत.

    नाशिकचे पालकमंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी ध्वजारोहणानंतर भाषण केलं. या भाषणात महाजन यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळला, असा आक्षेप वनसंरक्षक असलेल्या माधुरी जाधव यांनी केला. त्यांनी याविषयी महाजन यांना जाबही विचारला. त्यामुळे काहीसा गोंधळ उडाला. कारवाई करायची असेल तर खुशाल करा. हवं तर निलंबित करा, असा पवित्रा माधुरी जाधव यांनी घेतला आहे.

    यानंतर आता वनरक्षक माधुरी जाधव यांनी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. जाधव यांच्या सोबत वनरक्षक दर्शना सौपुरेंकडून महाजनांच्या विरोधात पोलीस तक्रार देण्यात आलेली आहे. यावेळी जाधव यांच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे हे प्रकरण अधिक तापण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

    माझ्याकडून बाबासाहेबांचा उल्लेख अनावधानानं राहून गेला, असं स्पष्टीकरण महाजन यांनी दिलं. त्यावरही माधुरी जाधव यांनी भाष्य केलं. ‘एखादी कमी शिकलेली व्यक्ती असेल तर अनावधानानं झालेली चूक मान्य करतो. पण सुशिक्षित आणि मोठ्या पदावरील व्यक्तीनं अशी चूक करणं अपेक्षित नाही. भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली. पण आमच्या जातीच्या लोकांना अद्याप स्वातंत्र्य मिळालेलं नाही. कायदा आणि संविधान असल्यानं आम्हाला माणूस म्हणून स्वीकारलं जातंय. कायदा आड येतो म्हणून ते आम्हाला माणूस स्वीकारतात, हे त्यांच्या कृतीतून आज लक्षात आलं,’ असं माधुरी जाधव तक्रार दाखल केल्यानंतर म्हणाल्या.

    आम्हाला कोणाचीही भीती वाटत नाही. पण आम्हाला इतिहासाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही. आज प्रजासत्ताक दिन . बाबासाहेबांनी संविधान दिलं हे जगजाहीर आहे. पण आजच्या घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेता घटनेशी संबंध नसलेल्या बाकीच्या लोकांची नावं आवर्जून घेतली गेली. याला आक्षेप असल्याचं माधुरी जाधव यांनी म्हटलं.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा