• Thu. Mar 12th, 2026

    भाजपच्या नेत्याला विनंतीवजा निरोप; राज ठाकरेंचा शिलेदार अस्वस्थ; सेना-मनसे युतीआधी काय घडलं?

    भाजपच्या नेत्याला विनंतीवजा निरोप; राज ठाकरेंचा शिलेदार अस्वस्थ; सेना-मनसे युतीआधी काय घडलं?

    कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपला शह देण्यासाठी शिंदेसेना आणि मनसेची युती झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शिंदेसेना व मनसेच्या माजी नगरसेवकांना पक्षात घेतल्याने राजू पाटील अस्वस्थ झाले होते.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे: शिंदेसेना आणि मनसेच्या युतीनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेना आणि भाजपनं युती करुन निवडणूक लढवली. एकूण १२२ सदस्य असलेल्या महापालिका सभागृहात त्यांना १०३ जागा मिळाल्या. भाजपला ५० आणि शिंदेसेनेला ५३ जागांवर यश मिळालं. दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागांमध्ये फारसं अंतर नसल्यानं महापौरपदासह अन्य समित्यांवरील दावे सांगण्यासाठी अन्य पक्षांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या. त्यात शिंदेसेनेनं मोठी आघाडी घेत थेट बहुमताचा आकडाच ओलांडला.

    शिंदेसेना आणि मनसे युतीच्या हालचाली महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ३ दिवसांनी सुरु झाल्या. मनसेला या निवडणुकीत ५ जागा मिळाल्या. भाजपला शह देण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पहिली बैठक ठाण्यातील येऊरमध्ये झाली. त्या बैठकीला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे , मनसेचे नेते राजू पाटील आणि संदीप देशपांडे उपस्थित होते. ही बैठक १९ जानेवारीला झाली. यानंतर २० जानेवारीला मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत युतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. मनसेनं पाठिंबा दिल्याची घोषणा श्रीकांत शिंदे यांनी २२ जानेवारीला नवी मुंबईतील कोकण भवन परिसरातून केली.

    मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना शिंदेसेनेत सोबत झालेल्या युतीची पूर्ण कल्पना होती. त्यांना कळवूनच मनसेचे नेते बैठकांना उपस्थित राहिले. शिंदेसेनेसोबत जाण्याची गरज त्यांना पटवून सांगण्यात आली. स्थानिक समीकरणं लक्षात घेऊन युतीचा निर्णय घेण्यात आला. या सगळ्याला गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये घडलेल्या घडामोडी कारणीभूत आहेत.

    महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आक्रमक हालचाली सुरु केल्या. शिंदेसेनेचे अनेक माजी नगरसेवक त्यांनी गळाला लावले. पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये घेतलं. मनसेच्या माजी नगरसेवकांनादेखील चव्हाण यांनी भाजपमध्ये घेतलं. त्यामुळे राजू पाटील प्रचंड अस्वस्थ झाले. फोडाफोड आणि पक्षप्रवेश थांबवा, असे विनंती करणारे निरोप त्यांना देण्यात आले. पण चव्हाणांनी पक्षांतरांचा धडाका लावला.

    अखेर एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठली आणि चव्हाण यांची तक्रार गृहमंत्री अमित शहांकडे केली. त्यानंतर स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय झाला. कल्याण-डोंबिवलीत शस्त्रसंधी झाली. पण श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील संधीची वाट पाहात होते. अखेर महापालिका निकालानंतर दोघांना संधी मिळाली. राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांचं जमत नाही. पण दोघांचा शत्रू एकच असल्यानं दोन्ही नेत्यांनी सोबत येण्याचा निर्णय घेतला.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा