• Tue. Jun 16th, 2026
    Kolhapur Election Results: कोल्हापुरात आमदाराच्या लेकाने बाजी मारली, ऋतुराज क्षीरसागर विजयी, विजय साळोखेंचा पराभव

    Kolhapur Election Results 2026: कोल्हापुरात आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर यांचा विजय झाला आहे. त्यांनी विजय साळोखे यांचा पराभव केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कोल्हापूर: राज्याच्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडल्यानंतर आज निकाल जाहीर होत आहेत. मुंबईत यंदा ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लावत भाजप-शिंदेसेना महायुती आपला झेंडा फडकवणार असं चित्र आहे. हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर, कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 7 डमधून कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर यांनी विजय झाला आहे. शिंदेसेनेकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर, त्यांच्या विरोधात अपक्ष विजय साळोखे हे रिंगणात होते. मात्र, या निवडणुकीत आमदार पुत्राने विजय मिळवला आहे.

    आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 ड मधील चुरशीच्या लढतीत विजय मिळवला आहे. माजी नगरसेवक विजय साळोखे यांच्याविरोधात ही लढत जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली होती. पारंपरिक राजकारण आणि स्थानिक संपर्काच्या जोरावर ऋतुराज यांनी सोशल मीडिया क्रेझला ठेंगा देऊन आपला गड राखला आहे.

    प्रभाग 7 ड: ऋतुराज क्षीरसागरांचा निर्णायक विजय

    प्रभाग क्रमांक 7 ड ही निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी लढत ठरली. अपक्ष उमेदवार विजय साळोखे यांनी ‘नो मेवा, ओन्ली सेवा’ ही प्रचार टॅगलाईन घेऊन इन्स्टाग्रामसह डिजिटल माध्यमांवर जबरदस्त वातावरण तयार केले होते. साळोखे यांच्या सोशल मीडिया क्रेझमुळे त्यांचा विजय निश्चित वाटत असला तरी मतदारांनी ऋतुराज क्षीरसागर यांना प्राधान्य दिले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या संघटित प्रचार, घराघरांतल्या संपर्काने आणि पारंपरिक मतदारसंघाच्या विश्वासाने ऋतुराज यांनी विजय खेचला. या निकालाने प्रत्यक्ष मैदानातील कामच निर्णायक ठरते, हे पुन्हा सिद्ध झाले.

    सोशल मीडिया विरोधात पारंपरिक ताकद

    एकूण 81 जागांच्या या निवडणुकीत महायुती (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) ने बहुमताकडे वाटचाल सुरू केली असली तरी काँग्रेसनेही काही प्रभागांत वर्चस्व राखले आहे. ऋतुराज क्षीरसागर यांच्या विजयाने सोशल मीडिया प्रचारापेक्षा संघटनात्मक शक्ती आणि स्थानिक पातळीवरील काम महत्त्वाचे असते, हे अधोरेखित झाले आहे. ऋतुराज यांच्या या विजयाने क्षीरसागर कुटुंबाची कोल्हापूर राजकारणातील पकड मजबूत झाली असून पुढील सत्ता समीकरणावर नजर राहणार आहे.

    इतर निकाल आणि राजकीय चित्र

    या विजयाबरोबरच कोल्हापूर महापालिकेतील इतर प्रभागांतही रोमांचक निकाल समोर आले आहेत. कोल्हापुरात दुपारी दोन वाजेपर्यंत भाजपाने 19, शिवसेनेने 14, अजितदादांच्या राष्ट्रवादीने 3, काँग्रेसने 24, शिवसेना उबाठा पक्षाने 1 जागेवर विजय मिळवला आहे तर 1 इतर जागा निवडून आली आहेत. एकूणच महायुतीचं पारडं कोल्हापुरात जड दिसत आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा