• Sun. Jun 14th, 2026
    Jalna Crime: विवाहित बहिण बेपत्ता झाल्याचं ऐकून भाऊ धावला, गावात पोहोचला अन् काळजाला धस्स, थेट बॉडी… जालन्यात खळबळ

    जालनासह राज्यभरात महिला अन्याय अत्याचार घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यामध्ये प्रामुख्याने घरगुती हिंसाचार वाढले आहेत…

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना: जालना जिल्ह्यातील वरखेडी परिसरात आज दुपारी एका २६ वर्षीय विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अश्विनी अमोल जोगदंड असे मयत महिलेचे नाव असून, तिच्या मृत्यूभोवती संशयाचे जाळे विणले गेले आहे. विशेष म्हणजे, विहिरीत आढळलेला मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असल्याने ही घटना केवळ आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय बळावला आहे.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी ही कालपासून घरातून बेपत्ता होती. तिचा पती अमोल जोगदंड याने अश्विनीचा भाऊ संदीप खरात याला फोन करून ती बेपत्ता असल्याची माहिती दिली. बातमी समजताच संदीपने तातडीने वरखेडी गाठले आणि बहिणीचा शोध सुरू केला. मात्र, काही वेळातच पती अमोलने अश्विनीचा मृतदेह गावाशेजारील विहिरीत तरंगत असल्याची धक्कादायक माहिती दिली. संदीपने विहिरीकडे धाव घेतली असता, तिथे जे दृश्य दिसले त्याने काळजाचा थरकाप उडाला. आपली बहीण विहिरीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून भावाने एकच टाहो फोडला.

    भावाचे पतीवर गंभीर आरोप

    याप्रकरणी मयत अश्विनीचा भाऊ संदीप खरात याने पती अमोल जोगदंड याच्यावर हत्येचा गंभीर आरोप केला आहे. “माझा भावजी बहिणीला नेहमी मारहाण आणि त्रास द्यायचा. तिचे चारित्र्य आणि घरगुती वादातून हा प्रकार घडला असावा,” असा संशय संदीपने व्यक्त केला आहे.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Election: निवडणूक प्रशासनाची मोठी कारवाई, तब्बल 155 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, कारण काय?

    अश्विनीचे वडील मुंबईत मोलमजुरी करतात आणि आईचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. अशा परिस्थितीत पित्याने लाडक्या लेकीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून कष्ट केले, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

    दोन गोंडस मुले पोरकी; पोलिसांकडून तपास सुरू

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे अश्विनीच्या दोन चिमुकल्या मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    अश्विनीने स्वतः उडी घेऊन आत्महत्या केली की तिची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आता शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. सध्या जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून, पोलिसांनी पुढील तपासाला वेग दिला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा