• Wed. Mar 11th, 2026

    ईरानमध्ये तणाव वाढल्याने भारताची ॲडव्हायझरी जारी; भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आदेश – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 14, 2026
    ईरानमध्ये तणाव वाढल्याने भारताची ॲडव्हायझरी जारी; भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आदेश – महासंवाद

    नवी दिल्ली,14: ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आज  एक महत्त्वाची ॲडव्हायझरी जारी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक सध्या तिथे वास्तव्यास आहेत त्यांना तातडीने उपलब्ध साधनांनी देश सोडण्याचा सल्ला दिला आहे.

    परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईरानमधील सध्याच्या गंभीर घडामोडी पाहता, जे भारतीय नागरिक सध्या तिथे आहेत, मग ते विद्यार्थी, पर्यटक, भाविक किंवा व्यावसायिक असोत, त्यांनी उपलब्ध व्यावसायिक विमानांनी किंवा इतर वाहतूक साधनांनी लवकरात लवकर ईरान सोडावे. यासोबतच, जे भारतीय नागरिक अद्याप त्या ठिकाणी आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांपासून किंवा गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहावे, अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, दूतावासाने नागरिकांना त्यांचे पासपोर्ट, ओळखपत्रे आणि इतर महत्त्वाची इमिग्रेशन कागदपत्रे सदैव स्वतःजवळ आणि तयार ठेवण्यास सांगितले आहे. तसेच, ज्या नागरिकांनी अद्याप दूतावासाकडे आपली नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ अधिकृत लिंकवर (https://www.meaers.com/request/home) जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. जर इंटरनेटच्या समस्येमुळे ईरानमध्ये ही नोंदणी करणे शक्य नसेल, तर भारतातील त्यांच्या कुटुंबियांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

    आपत्कालीन मदतीसाठी भारतीय दूतावासाने खालील हेल्पलाईन क्रमांक आणि ईमेल जारी केले आहेत: कोणत्याही मदतीसाठी भारतीय नागरिक +989128109115, +989128109109, +989128109102 आणि +989932179359 या मोबाईल क्रमांकांवर किंवा [email protected] या ईमेलवर संपर्क साधू शकतात.

    ईरानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय अस्थिरता आणि हिंसक संघर्ष सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारत सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत असून नागरिकांनी दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    *********

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed