कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावर दुर्गमानवाड येथे भानामती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोल्हापूर: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची तयारी पूर्ण होऊन सर्वांचे लक्ष मतदानाकडे लागले आहे. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावर राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथे भानामती केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या ठीक आदल्या दिवशी हा प्रकार समोर आल्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तीव्र खळबळ उडाली आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून रविकिरण इंगवले शहरातील विविध स्थानिक समस्या, सामाजिक प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यांवरून आंदोलने करत आहेत. महापालिका निवडणुकांच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांवर गुन्हेगारी पार्श्वभूमी, भ्रष्टाचार आणि नातेवाईकांना उमेदवारी देण्याचे गंभीर आरोप त्यांनी केले. बलभीम बँक घोटाळा, आमदार पुत्राची उमेदवारी यासह विविध मुद्द्यांवरुन त्यांनी प्रचारसभांमधून जोरदार हल्ला चढवला होता.
जिथे भाजप-MIMची युती, तिथेच शिंदेसेनेचा मोठा डाव; ‘धुरंदर’ नेत्याला मदतीसाठी साद, निकाल फिरणार?
या काळात इंगवले यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभागांतील रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेजसारख्या समस्या उपस्थित करून नागरिकांमध्ये पक्षाची पकड मजबूत केली. पक्षाच्या वचननामा प्रकाशन सोहळ्यातही त्यांनी उपस्थिती लावून विकासाभिमुख भूमिका मांडली. महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध त्यांचे आरोप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र झाले होते.
दुर्गमानवाड येथे भानामतीचा प्रकार
सोमवारी मध्यरात्री राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड देवस्थान मंदिराजवळील झाडावर इंगवले यांचा फोटो खिळे ठोकून भानामती करण्यात आली होती. काळी बाहुली, लिंबू, टाचण्या यांसारखे साहित्य वापरल्याची माहिती समोर आली असून, हा प्रकार आज सकाळी ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आढळला. त्यांनी तात्काळ इंगवले यांना कळवले. मतदानाच्या एका दिवस आधी असा प्रकार घडल्याने दुर्गमानवाड आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले. स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनी घटनास्थळी जमा होऊन निषेध व्यक्त केला.
बदलापूर भाजपची पाठ सोडेना; शिंदेंच्या होमपीचवर पुन्हा गोची; स्वपक्षीयांमुळे ‘स्वीकृत’ अडचण
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आघाडीने वचननामा जारी करून विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला आहे. इंगवले यांच्या आक्रमकतेमुळे महायुतीमध्ये अस्वस्थता असल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात. त्यातच हा प्रकार निवडणुकीच्या वातावरणात तणाव वाढवणारा ठरला आहे. दरम्यान परिसरातील ग्रामस्थांनी अंधश्रद्धेच्या विरोधात आवाज उठवला असून, पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. राजकीय वर्तुळात याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
