• Tue. Mar 10th, 2026
    Maharashtra Election: मतदान किंवा मतमोजणीवेळी EVM बिघडल्यास काय? निवडणूक आयोग घेणार नव्या यंत्राची मदत; कसा होणार फायदा?

    म. टा. खास प्रतिनिधी: मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी निकाल लवकर लागावेत यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानावेळी, मतमोजणीवेळी मतदानयंत्रात (ईव्हीएम) बिघाड झाल्यास किंवा तांत्रिक गोंधळ निर्माण झाल्यास प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात ‘पाडु’ या यंत्राची मदत घेतली जाणार आहे.

    मुंबईतील २२७ प्रभागांतील मतमोजणीला वेळ लागण्याची शक्यता आहे. सुरुवातीला एका वॉर्डमधील एकावेळी फक्त दोन प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. ही मतमोजणी पूर्ण होताच त्यानंतर त्याच वॉर्डमधील पुढील प्रभांगाची मतमोजणीला सुरुवात होईल. ‘पाडु’ हे बेंगळुरूतील भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (बीईएल) या कंपनीने विकसित केले आहे.

    महापालिकेने मतदानासाठी विक्रोळी येथील गोदामात १० हजार ८०० कंट्रोल युनिट आणि १३ हजार ५०० बॅलेट युनिट, तर कांदिवलीतील गोदामात ९ हजार २०० कंट्रोल युनिट आणि ११ हजार ५०० बॅलेट युनिट सज्ज ठेवले आहेत. हे जुन्या पद्धतीचे युनिट असून मतदान यंत्राद्वारे नोंदविलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनच करणे आवश्यक आहे. मात्र, मतमोजणीवेळी त्याचा डिस्प्ले खराब झाला किंवा अन्य तांत्रिक बिघाड झाल्यास त्याचे बॅकअप युनिट म्हणून ‘पाडु’ ही यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे.

    दरम्यान, एखाद्या मतदान केंद्रात ईव्हीएममध्ये बिघाड झाला तर ‘पाडु’ यंत्रणेतून त्याचा बॅकअप घेता येऊ शकतो, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. या यंत्रणेचा वापर महापालिका निवडणुकीत केला जाणार आहे. १४० ‘पाडु’ यंत्र महापालिकेला निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर प्राप्त झाली आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed