• Fri. Mar 6th, 2026
    ZP Election Date: जिल्हा परिषद निवडणुकांची तारीख अखेर जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा आहे निवडणूक कार्यक्रम

    मुंबई: राज्यात मागील काही महिन्यांपासून ज्या निवडणुकांची प्रतीक्षा होती त्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांची अखेर आज घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि त्या अंतर्गत असणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहे. यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने आजपासून सदर जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागली आहे. या निवडणुकीसाठी मतदान ५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. तसंच मजमोजणी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून करण्यात येणार आहे.

    जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी (ZP & Panchayat Samiti Election) १६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अर्जांची छानणी २२ जानेवारी रोजी होईल आणि उमेदवारी माघारीची अंतिम तारीख २७ जानेवारी असणार आहे. अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप- २७ जानेवारी दुपारी साडेतीन वाजेनंतर होईल.

    दरम्यान, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या इतर २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका नंतर घेण्यात येणार आहेत.

    राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या पुणेजिल्हा परिषदेसह १२ जिल्हा परिषदा आणि त्या जिल्ह्यांतील पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीची तयारी करा, अशा शब्दांत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच पत्र पाठवून आदेश दिला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    राज्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:

    – दुबार मतदार आम्ही निश्चित केले असून त्याबाबतची कार्यवाही अधिकारी करतील.

    – मताधिकार मोबाईलअॅपद्वारे मतदाराला त्याला त्याचा निवडणूक विभाग, मतदान केंद्र शोधता येईल

    – मतदाराला आयोगाच्या वेबसाईटवरही त्याचं नाव टाकून त्याचे मतदान केंद्र शोधता येईल

    – ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर आणि तान्ह्या बाळासह असणाऱ्या स्त्रियांना मतदानावेळी प्राधान्य देण्यात येईल

    – १२ जिल्हा परिषदांमधून ७३१ सदस्य निवडून दिले जातील

    – १२५ पंचायत समित्यांमधून १ हजार ४६२ सदस्य निवडून दिले जातील

    राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकाअंतिम टप्प्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी लागणार याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांना होती. दरम्यान, निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. दरम्यान, राज्यातील २० जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर येत्या २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे. दरम्यान, ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यासाठी आयोगाने मुदतवाढ मागितली होती. त्यावर येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल दिले. त्यानंतर आज ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असणारे १२ जिल्हे असून त्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकींची अखेर आज घोषणा करण्यात आली आहे.

    पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि त्या अंतर्गत असणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहे. जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसिलदारांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियु्क्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुका या निर्भय, मुक्त तसेच पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची सर्व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तसेच पर्यवेक्षक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed