मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या प्रचारसभेत राज्य सरकारवर पैसे वाटपाचे गंभीर आरोप केले. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या कोणकोणत्या उमेदावारांना कोट्यवधींचे पैशांची ऑफर देण्यात आली ती माणसं थेट मंचावर बोलावली.
“भाजपचे लोकं पैसे वाटत आहेत आणि शिंदेंचे लोकं पैसे वगळत आहेत. त्यादिवशी मी कल्याण डोंबिवलीला गेलो. मतदारसंघात फिरलो. तिकडे प्रचंड हवा आहे. सगळ्या गोष्टी तिकडे करुनही मी आज कल्याण डोंबिवलीतील लोकांना इथे बोलावणार होतो. पण आता प्राचाराचे शेवटचे दोन दिवस आहेत. त्यामुळे ते इथे येऊ शकले नाहीत. मला त्यांना तुमच्यासमोर आणायचं होतं. अनेक लोकं आहेत. आज घराघरात मतांसाठी प्रत्येकी पाच-पाच हजार वाटत आहेत”, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.
“मला या लोकांचं समजत नाही, कारण एका बाजूला विकास करतोय आणि दुसरीकडे सांगतात पैसे देतो मतदान करा. मग विकास काय केलं? मला घेणाऱ्यांची चिंता आहे. देणाऱ्यांची नाही. आपण पाच-पाच हजार रुपयांत मतदान करतोय. आपण आपल्या घरातील मुलांना आणि मुलींना काय शिकवताय? माझा बाप विकला गेला, माझी आई विकली गेली. माझ्या वडिलांनी आणि आईने पैशांसाठी मत विकली? उद्या त्या मुलांचे मित्र परिवार काय म्हणतील? विकले जातात?”, असे सवाल राज ठाकरेंनी केला.
“पूर्वी जसा गुलामांचा बाजार मांडलेला असायचा, तसा गुलामांचा बाजार कल्याण डोंबिवलीत मांडलेला होता. महाराष्ट्रात 66 ठिकाणी पैसे देवून, पैसे वाटून अर्ज माघारी घ्यायला लावले. त्यादिवशी मी माझ्या नाशिकच्या सभेत बोललो होतो. वेडेपिसे झाले आहेत. त्या दिवशी एका माणसाने समोरचाचा एबी फॉर्म गिळून टाकला. इथपर्यंत तुम्ही गेलात?”, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
“सोलापुरात आमच्या एका माणसाचा खून झाला. आमच्या विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता. इथपर्यंत सरकार चाललं आहे? पोलीस हताश. कोर्टाकडे तर बघायलाच नको. हे कोणतं राज्य आहे. बिनधास सगळ्या गोष्टी सुरु आहेत. म्हणून मला म्हटलं ती माणसं आणायची आहेत. पण प्रचारात गुंतले आहेत त्यामुळे त्यांना बोलवता आले नाही. मी फक्त दोन-तीन माणसांची नावे घेतो. बाकीचे आता येतील”, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
“शैलेश धात्रक, मनिषा धात्रक आणि पूजा धात्रक हे एकाच प्रभागात तीन कुटुंबिय उभे आहेत. किती पैसे ऑफर झाले असतील? तुम्ही कल्पनाही करु शकत नाही. म्हणजे काय लेव्हलचा बाजार मांडलाय या लोकांनी. या तीन लोकांना 15 कोटींची ऑफर दिली. पण त्या तीनही जणांनी 15 कोटींची ऑफर नाकारुन ते निवडणुकीला उभे राहिले. 15 कोटींची ऑफर नाकारणारे कुठे आणि पाच-पाच हजारात मत विकणारे कुठे? दुसरी मुलगी सौ. राजश्री नाईक. कितीची ऑफर तर 5 कोटी रुपयांची झालेली. ती गोष्ट नाकारणारे , हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त. सुशील आवटे या तरुणाला 1 कोटी रुपयांची ऑफर झाली. नाकारली. अजून बरेच जण आहेत”, असा मोठा दावा राज ठाकरे यांनी केला.
“कुठून येतो हा पैसा? काय चाललंय हे? अहो तुम्ही हे फक्त दोन-तीन जण पाहताय. महाराष्ट्रभर हे सुरु आहे. कोट्यवधी रुपये दिले गेले. ही कोणती महाराष्ट्राची निवडणूक आहे? आजपर्यंत अशी निवडणूक कधीच पाहिली नाही. या लोकांना काही लगामच नाही. बिंधास हवं ते करायचं आहे. कोर्ट, पोलिसाता जावून उपयोग नाही. बस, आमची मर्जी”, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
