अंबरनाथ नगरपालिकेत भाजपसोबत युती करणे काँग्रेसला महागात पडले आहे. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेससोबत हातमिळवणी केली.
अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून पाटील यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत. ‘आपण अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली असून आपल्या पक्षाचे बारा सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र आपण प्रदेश कार्यालयात कोणतीही माहिती न देता अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचे प्रसार माध्यमांद्वारे कळाले. ही बाब अत्यंत चुकीची असून पक्षस्थितीचा भंग करणारी आहे,’ असं पाटील यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
अजितदादांच्या धुरंधर नेत्याविरोधात भाजपची फिल्डींग; विधानसभेला सव्वा लाख मतं घेणारा नेता परतणार
अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. सोबतच पाटील यांची ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे आपल्या सोबत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांनासुद्धा पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे, असा उल्लेख पत्रात आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत भाजपनं सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिंदेसेनेला सत्तेपासून दूर राखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतलं. अंबरनाथमध्ये भाजपचे १६ आणि काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आले आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक आहेत. भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवलं. या विचित्र युतीची राज्यभरात चर्चा झाली. त्यानंतर काँग्रेसनं त्यांच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांवर कारवाई केली आहे.
PM मोदींच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ला मूठमाती; भाजपची काँग्रेसशी युती, शिंदेसेनेला बाजूला सारलं
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसमुक्त भारतची घोषणा देत असताना दुसरीकडे अंबरनाथमध्ये भाजपनं थेट काँग्रेसशी युती केली. या युतीमुळे शिंदेसेनेला सत्तेपासून दूर राहावं लागलं. ही विचित्र आणि अनैसर्गिक युती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी कारवाईचा इशारादेखील दिला. पण भाजपनं कारवाई करण्याआधी काँग्रेसच्या राज्य नेतृत्त्वानं निलंबनाचा बडगा उगारला आहे.
