Kolhapur Politics: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढलेला नेता लवकरच भाजपच्या गोटात परतणार असल्याची चर्चा आहे. तशा घडामोडींना सुरुवात झाली आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौपा पूर्ण झाल्यानंतर समरजीत घाटगे यांचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला जाण्याची दाट शक्यता आहे. ८ जानेवारीला समरजित घाटगे कागलमध्ये राजे गटाचा मेळावा घेणार आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीतील भूमिकेबद्दल या मेळाव्यात महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मेळाव्याबद्दल राजकीय वर्तुळात उत्कंठा आहे. या बैठकीतून घाटगे त्यांच्या समर्थकांना पुढील दिशा देतील अशी चर्चा आहे.
मोदींच्या कॅबिनेटमधून आठवलेंना डच्चू? पण कार्यकर्ते वेगळ्याच कारणानं नाराज, येत्या एप्रिलमध्येच…
२०२४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी घाटगे यांनी केली होती. पण २०२३ मध्ये अजित पवारांची युतीत एन्ट्री झाली. अजित पवारांसोबत त्यांच्या पक्षाचे ४० आमदारदेखील महायुतीत आले. या आमदारांमध्ये हसन मुश्रीफ यांचाही समावेश होता. मुश्रीफ कागलचे ६ टर्मचे आमदार आहेत. मुश्रीफ महायुतीत आल्यानं महायुतीत कागलची जागा राष्ट्रवादीला सुटली. त्यामुळे नाराज झालेल्या घाटगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढत समरजीत घाटगे यांनी तब्बल १ लाख ३३ हजार ६८८ मतं घेतली. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात त्यांनी ताकद दाखवून दिली. मुश्रीफ ११ हजार ५८१ मतांनी विजयी झाले. घाटगे यांनी २०१९ मध्ये मुश्रीफ यांच्या विरोधात अपक्ष लढून ८८ हजार ३०३ मतं घेतली होती. त्यामुळे घाटगे यांना मानणारा मोठा वर्ग कागलमध्ये असल्याचं अधोरेखित झालं आहे.
ठाकरे बंधू विरुद्ध शिंदे, अनेकांची करिअर पणाला; शिवसेना कोणाची? ‘त्या’ ८७ जागा ठरवणार
२०२९ मध्ये भाजप राज्यात स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे २०२४ मध्ये मित्रपक्ष शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकलेल्या जागांवर भाजपनं लक्ष केंद्रीत केलं आहे. दादा आणि भाईंच्या आमदारांविरोधात भाजप तगडे चेहरे हेरत आहे. काँग्रेसच्या अनेक माजी आमदारांना भाजपनं आपल्याकडे घेतलं आहे. घाटगे यांच्या पक्ष प्रवेशाच्या हालचालीदेखील मिशन २०२९ चाच भाग असल्याचं मानलं जात आहे.
