Local Train Schedule: आधीच अपुऱ्या लोकल फेऱ्यांमध्ये आता पुन्हा वेळेत बदल झाल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि शेतकरी प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचं चित्र आहे.
पश्चिम रेल्वेच्या नव्या वेळापत्रकानुसार १ जानेवारीपासून काही लांब पल्ल्याच्या मेल व एक्स्प्रेस गाड्यांच्या सुटण्याच्या किंवा पोहोचण्याच्या वेळा सात ते दहा मिनिटांनी बदलण्यात आल्या आहेत. याचा थेट परिणाम उपनगरी लोकलसेवांवर झाला आहे. पहाटे कामावर जाणाऱ्या तसेच रात्री परतणाऱ्या लोकल सेवा पाच मिनिटे पुढे-मागे करण्यात आल्या आहेत. डहाणू ते वैतरणादरम्यानच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिक विरारपुढे नोकरीसाठी प्रवास करतात. या नोकरदारांचा विचार न केल्याचा आरोप करत प्रवासी व संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे.
पहाटेच्या वेळेत लोकल पकडण्यासाठी ठराविक खासगी वाहनसेवा व एसटीची सोय उपलब्ध असते. मात्र, सध्याच्या वेळापत्रकानुसार एसटी पकडल्यास लोकल निघून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे खासगी वाहनसेवा व एसटीच्या वेळापत्रकातही बदल करावे लागणार आहेत.
दरम्यान, मेल-एक्स्प्रेसला प्राधान्य दिल्यामुळे काही सकाळच्या लोकल सात ते दहा मिनिटे उशिराने किंवा लवकर धावत आहेत. परिणामी काही लोकल बाजूला काढण्यात येतात. त्यामुळे नोकरदारांना कार्यालयांमध्ये पोहोचण्यास उशीर होत आहे.
